राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे आवाहन
आमदार म्हणताहेत की कासवरीच बांधकामे अधिकृत करा तर खासदार म्हणताहेत की बाहेरच्यांची बांधकामे पाडा. पण चार भिंती, अजिंक्यतारा, बोगदा, महादरे व पेढ्य़ाच्या भैरोबा, कास, येवतेश्वर ही साताऱ्याची फुप्फुस आहेत. अशा परिस्थितीमध्ये या सर्व परिसराला अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम यांनी विळखा घातलेला आहे. दोघा भावांनी साताऱ्याचे वाटोळं थांबवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक पवार यांनी पत्रकाद्वारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांना केले आहे.
सध्या कासवरील अनाधिकृत बांधकामावरुन चांगलेच रान पेटले आहे. त्यामध्ये आता राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, “तुम्ही मंडळी येवतेश्वर कास रस्त्याबद्दल बोलत आहात. आधी आपल्या शहराचा विचार करा आणि तिथली बांधकाम पाडा. आमदार म्हणतात की बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करा आणि खासदार म्हणतात की बाहेरच्या लोकांचे बांधकाम पाडा आणि स्थानिक लोकांचे बांधकाम ठेवा. उद्या सातारा शहरांमध्ये या परिसरात असलेली बांधकामे कोणत्या धर्तीवर पाडायची? चार भिंतीचा परिसर गिळंकृत झालेला आहे. अजिंक्यताराच्या दरवाजापर्यंत अतिक्रमणाची घरे येऊ लागतील. बोगदा परिसर, संपूर्ण अतिक्रमीत झालेले आहे. पेढ्य़ाच्या भैरोबाला देखील अतिक्रमणाला सुरुवात झालेली आहे. महादरे येथे वनक्षेत्र असल्याने ते थोडसे वाचले आहे. केवळ येवतेश्वर कास रस्ता हाच खऱ्या अर्थाने निसर्ग संपन्न आणि मोकळा श्वास घेण्यासारखा राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणाई, त्याचबरोबर कुटुंबीय, त्यांचे पै पाहुणे, मित्रपरिवार, या ठिकाणी भेटीस येतात. परंतु अलीकडे जशी या ठिकाणी गर्दी वाढू लागली तसा या ठिकाणी बाजार सुरू झालेला आहे. ज्याला मिळेल त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. अवैध धंदे, त्याचबरोबर रस्त्याच्या कट्ट्य़ावर राजरोसपणे बसून दारूच्या बाटल्या फोडणे सुरु झाले आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर पूर्णपणे उध्वस्त होत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निसर्ग आणि पर्यावरण वाचवायचे असेल तर बेकायदेशीर बांधकाम तोडणे गरजेचे आहे.”असे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.