खासदार विनायक राऊत यांचा बंडखोर आमदारांवर हल्लाबोल : सर्व चाळीस आमदार अपात्र होतील विश्वास केला व्यक्त : कोटय़वधींच्या संख्येने सदस्य नोंदणी करा
प्रतिनिधी/कोल्हापूर
खोक्याच्या अमिषाला बळी पडून शिवसेनेतील आमदारांनी बंड केले. आता ते शिवसेनेवर हक्क सांगू पाहत आहेत. शिवसेना संपविण्याच्या भाजपच्या कटात वाटेकरी असलेल्या या बाजार बुणग्यांची नव्हे तर बाळासाहेब-उद्धवजींची ही शिवसेना असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे सिद्ध करण्यासाठी हजारो लाखोंच्या नव्हे तर कोटय़वधींच्या संख्येने शिवसेना सदस्य नोंदणी करा, असे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पुढील काळात शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल आणि बंडखोर सर्वच्या सर्व 40 आमदार अपात्र ठरतील असा विश्वासही यावेळी राऊत यांनी व्यक्त केला.
जिल्हय़ातील शिवसैनिकांचा शुक्रवारी संगीतसूर्य केशवराव भोसले येथे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला. याप्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे आदी पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाचा त्यांच्या शिष्याने बाजार मांडला आहे. धर्मवीर सिनेमामधून त्यांनी दिघेंऐवजी स्वतःचे मार्केटींग केले. हा सिनेमाही बंडखोरीचाच एक भाग असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगित केला. यामधून सत्तेसाठी लाचारी पत्करल्याचं सिद्ध होत आहे. त्यामुळे शिंदे कपाळाला जो हिंदूत्वाचा टिळा लावतात तो लावण्याचा आता त्यांना अधिकार नाही. शिंदेंचे सरकार जास्तीत जास्त सहा महिने चालेल. यानंतर खोक्याच्या राजकारणाला बळी पडलेल्या या आमदारांचे राजकीय भविष्य संपणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : कोल्हापुरात शिंदेगट म्हणून निवडणूक लढवून दाखवा ; संजय पवारांचे क्षीरसागरांना आव्हान
नकली धर्मवीराच्या राजकारणातून मुक्त झाला
आलीबाबा आणि चाळीस चोरांच्या टोळीत सहभागी झालेले कोल्हापुरचे नकली धर्मवीर यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या उद्धारासाठी पद मिळेल या अपेक्षेने शिंदे गटात गेले. नकली धर्मवीरामुळे कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक बाजूला गेले होते. मात्र आत या नकली धर्मवीराच्या राजकारणातून तुम्ही मुक्त झाला आहात, अशी टिका राजेश क्षीरसागर यांच्यावर केली. तसेच आत सर्वांनी एकत्र येवून कोल्हापूर हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन केले.
चंद्रकांत दादांच्या कुळांचा उद्धार केला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा माझे नेते आहेत असे म्हणत क्षीरसागर यांनी दादांच्या 84 कुळांचा उद्धार केला आहे. यापूर्वी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आणि आता पदासाठी त्यांना नेता म्हणता, त्यामुळे या बहुरुपी बाहुल्याला दादा वेळीच ओळखा असा सल्लाही राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला.
दिल्लीकरांनी फडणवीसांचा बकरा केला
देवेंद्र फडणवीस हे पुढील काळात दिल्लीत गृहराज्य मंत्री होणार होते. मात्र दिल्लीने पहिल्यापासूनच महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. राज्यात सत्तांतर करण्यासाठी दिल्लीकरांच्या पाठबळावर फडणवीस यांनी महाराष्ट्रात किती कटकारस्थानं केली. मात्र सत्तांतरानंतर दिल्लीने त्यांचाच बकरा करत बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. फडणवीस यांच्यासारख्या निष्ठावंत भाजप कार्यकत्यांची झालेली अवहेलना बगवत नसल्याची खोचक टिका राऊत यांनी केली.
आदिवासी महिला म्हणून पाठींबा
राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना कोणाच्याही दबावाने पाठींबा दिलेला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही प्रतिभा पाटील यांना पाठींबा दिला होता. त्याचप्रमाणे दिनदुबळय़ांच्या उद्धारासाटी झटणारी एक आदिवासी महिला म्हणून मुर्म यांना शिवसेनेने पाठींबा दिल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : शिवसैनिकांच्या केसाला जरी हात लागला तर…ठाकरेंचा इशारा
महाराष्ट्राचे तुकडे होवू देणार नाही
दिल्लीला नेहमीच महाराष्ट्रवार सुड उगवायचा आहे. मुंबई गुजरातला, नागपूर विदर्भला, पश्चिम महाराष्ट्र कर्नाटकला जाडून दिल्लीकरांचा महाराष्ट्राचे तीन तुकडे करुन उर्वरीत महाराष्ट्र ठेवायचा आहे. पण त्यांचे हे कटकारस्थानं शिवसेना कदापी यशस्वी होवू देणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.
शिवसैनिकांच्या साथीने गरुडभरारी घेणार
बंडखोरांचे खोके घेवूनही समाधान झालेले नाही. आता ते ठाकरे कुटंबाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमच्या कोकणतील पोपट केसरकर आणि बुडकेश्वर राणे यांने पणवती पाय भाजपमध्ये गेले आहेत. बंडखोर आमदार हे शिवसैनिकांच्या जीवावरच मोठे झाले आहेत. मात्र त्यांना याचा विसर पडला आहे. सध्या शिवसेनेची वाटचाल खडतर असली तरी शिवसैनिकांच्या साथीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरी पुढील काळात नक्कीच गरुड भरारी घेतील असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.