राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेतील कामकाजाचा हवाला देऊन गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक किंवा चौकशीपासून सूट मिळण्याचा दावा खासदार करू शकत नाहीत, असे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण शुक्रवारी राज्यसभेचे सभापती आणि भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिले. राज्यसभेला संबोधित करताना सभापतींनी यासंबंधी विविध कायद्यांचा संदर्भही दिला आहे. गुरुवारीच संसदेमध्ये काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी यासंबंधीचा मुद्दा उपस्थित करत ईडीकडून स्वतःला बजावण्यात आलेले समन्स अयोग्य असल्याचे म्हटले होते. संसद कामकाज सुरू असताना तपास यंत्रणा मला चौकशीसाठी कशा काय पाचारण करतात? असा प्रश्न खर्गे यांनी सभागृहात उपस्थित केला होता.
गेल्या दोन-तीन दिवसांत जे काही घडले आहे, त्यावरून मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. संसदेच्या अधिवेशनकाळात आपल्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, असा गैरसमज सदस्यांमध्ये असतो. तथापि, यावर गांभीर्याने विचार करत सर्व प्राधान्यक्रम तपासून राज्यसभेच्या सभापतींनी घटनेच्या कलम 105 चा हवाला देत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार अधिवेशन सुरू असतानाही खासदारांना अटक करण्यासह तपासासाठी बोलावण्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले. खासदारांना अटक करणे, ताब्यात घेणे, अधिवेशनाच्या काळातही त्यांची चौकशी करणे बंधनकारक असल्याच्या यापूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भही त्यांनी दिला.