मुंबई \ ऑनलाईन टीम
MPSC विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं, पण आता मुदत उलटून गेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवारांनी एका युजर्सचे ट्विट रिट्विट करत अजित पवार हे शब्द पाळणारे नेते असल्याचे म्हटले आहे.
ट्विटरवर विकास भारती नावाच्या एका युजर्सने 31 जुलै च्या आधी MPSC आयोगातील सदस्य भरणार होते, काय झालं? असं सवाल विचारणारं ट्विट केलं. त्या युजर्सच्या प्रश्नाला उत्तरं देणारं ट्विट रोहित पवार यांनी केलं. ज्यातून 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवली असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर रोहित पवार यांनी त्याचे ट्विट रिट्विट करत म्हटले आहे की, माननीय अजितदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, खोटं बोलणारं सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असून, काहीही झालं की, वेळ मारून न्यायची एवढच यांचं काम आहे. घोषणा करायची, मात्र काही अंमलबजावणी करायची नाही. याबाबत उत्तम उदाहरण म्हणजे स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्याच्याबाबत विधानसभेत करण्यात आलेली घोषणा. शब्द दिला पण तो शब्द पाळला नाही. प्रत्येक विषयावर थापा मारणार का?, असा संतप्त सवाल चंद्रकांत पाटील यांनी करत राज्य सरकारवर निशाणा साधला.
पुण्याच्या स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन महाराष्ट्रात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यी आणि पालकांना दिलासा देण्यासाठी तसंच एमपीएससीचा कारभार गतीमान व्हावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. 31 जुलैपूर्वी आयोगातील सर्व महत्त्वाची पदे भरण्यात येतील, अशी माहिती त्यांनी अधिवेशन काळात विधानसभेत दिली. त्यानुसार 31 जुलैपूर्वीच सदस्यांची यादी राज्य शासनाने राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे.