काँग्रेस परिवहन विभागाचे अध्यक्ष विजयसिंह पाटील यांचा सवाल : ऍड. सदावर्तेंकडून एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकविण्याचे काम : संपामुळे एसटीचे प्रचंड नुकसान
प्रतिनिधी/कोल्हापूर
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर असताना एसटीच्या राज्यशासनात विलिनीकरणासाठी सहा महिने संप करण्यात आला. ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यात सत्तांतरानंतर सत्तेवर आलेल्या एका राजकीय पक्षाच्या मदतीने एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकविण्याचे काम केले. आता सदावर्ते यांच्या विचाराचे सरकार राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे या सरकारने वेळ न लावता एसटीचे तातडीने राज्य शासनात विलिनीकरण करावे, अशी मागणी काँग्रेसच्या परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य परिवहन महामंडळाचे माजी वाहतूक अधीक्षक विजयसिंग पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱयांच्या न्याय हक्कासाठी हा लढा उभारला होता. सदावर्ते यांनी यात विशिष्ट पध्दतीचे राजकारण आणून स्वतःची पोळी भाजून घेतली. यात मात्र एस.टीचा कर्मचारी भरडला गेला. अनेकांचे संसार देशोधडीला लागले. संप मिटला असला तरी संपकाळातील थकलेल्या कर्जाचे हप्ते आता वसूल केले जात आहेत. यामुळे निष्पाप कर्मचारी पुरता हबकून गेला आहे. कुटुंबांच्या उदरनिर्वाहाबरोबर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. याकडे मात्र सदावर्ते आणि त्यांना पाठीशी घालणारे नेते मूग गिळून गप्प आहेत. मुंबईतील आझाद मैदानात आमचे सरकार असते तर पहिल्यांदा एस.टी.चे विलनीकरण केले असते, अशा राणाभीमदेवी थाटात घोषणा करणारे सध्या मात्र नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे उटसुट महाविकास आघाडीवर तोंडसुख घेणारे सदावर्ते यांनी आता त्यांच्या नेत्यांना जागे करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. या नेत्यांना जागे करण्यासाठी सह्यांची मोहीमही राबवणार असल्याचे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
सदावर्तेकडून एका राजकीय पक्षाची पोळी भाजण्याचे काम
एसटीच्या संपात कर्मचाऱ्यांच्या घरादाराची राखरांगोळी झालीच पण एस.टी. महामंडळाचेही तब्बल अडीच हजार कोटींचे नुकसान झाले. संपावेळी सदावर्ते यांनी एका राजकीय पक्षाची तळी उचलत महाविकास आघाडीला टार्गेट केले हेते. सध्या सदावर्ते यांच्या विचारांचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. त्यामुळे त्यांनी व तथाकथित नेत्यांनी आता एस.टीचे शासनात विलनीकरण कधी होणार हे जाहीर करावे.