ऑनलाईन टीम/तरुण भारत
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या वारकऱ्यासांठी एसटी महामंडळाकडून (MSRTC) विशेष गाड्यांची सुविधा केली जाते. याच पार्श्वभूमीवर यंदाही एसटी महामंडळाने बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी ही घोषणा केली.
दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. त्यामुळे भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे, तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूप पणे गावी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एस महामंडळावर आहे. म्हणून पंढरपूर यात्रेसाठी सुमारे ४ हजार ७०० गाड्या सोडण्यात येत आहे.
दिनांक ६ जुलै ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी ८ जुलै रोजी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांना या बस सेवेचा लाभ घेता येणार आहे.