नागरी सुविधांकडे करंबळ ग्रा. पं. चे दुर्लक्ष
प्रतिनिधी /खानापूर
करंबळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील साईनगर या वसाहतीत कोणत्याच नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. रस्ते, गटारी, विद्युतपुरवठा, पाणीपुरवठा नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करंबळ पीडीओंना निवेदन देऊन करण्यात आली.
करंबळ ग्रा. पं. क्षेत्रात रुमेवाडी क्रॉस परिसरातील साईनगर वसाहतीत रस्त्याचे अस्तित्व नष्ट होऊन चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या वसाहतीतील नागरिकांना चिखलातून वाट काढत जावे लागत आहे. या ठिकाणी गटारी तसेच पाणी सुविधाही देण्यात आली नाही. रुमेवाडी परिसरात नवीन वसाहती तयार होत आहेत. येथे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मात्र ग्राम पंचायतीने या नव्या वसाहतीत कोणत्याच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. मात्र, या वसाहतीतील नागरिकांकडून करवसुली करण्यात येते. यासाठी या वसाहतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आली.
यावेळी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष भैरू पाटील, शिवाजी गुंजीकर, रमेश कौंदलकर, बळीराम खन्नूकर, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.