दुचाकी वाहनधारकांसाठी रस्ता बनला धोकादायक : त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव-अनगोळ या संपर्क रस्त्याचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र ओंकार नगर परिसरात हे काम रखडल्याने पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी या परिसरात वाहनधारक घसरून पडत असल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अनगोळ रस्त्याचा विकास करण्याचे काम हाती घेऊन वर्ष होत आले पण कामाची पूर्तता झाली नाही. रस्त्याचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे. ठिकठिकाणी गटारीचे बांधकाम करण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. परिणामी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा रस्ता दुचाकी वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. चिखलात दुचाकी वाहने घसरून पडत असल्याच्या तक्रारी होत आहेत. दररोज तीन-चार दुचाकी वाहनधारक घसरून पडून जखमी होत आहेत. सध्या या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने रहिवाशांसह वाहनधारकांना डोकेदुखी बनले आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.