ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतं दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी गौतम अदाणी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली होती. त्यांनतर आता उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
अनंत अंबानी शुक्रवारी रात्री ८.२० च्या दरम्यान मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर, रात्री उशीराने ११.३० च्या सुमारास ते तेथून बाहेर पडले. अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. यावेळी आदित्य ठाकरेदेखील तिथे उपस्थित होते.
जून महिन्यापासून राज्यात अनेक वेळा राजकीय उलथापालथ झाली. अडीच वर्षांतच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आलं. तेव्हापासून राज्यातील राजकारणात नियमित बदल होते आहेत.
दरम्यान, २१ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांची भेट झाली होती. मातोश्रीवरच या दोघांची चर्चा झाली होती. गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात. व्यापार-उद्योग आणि रोजगारीवरून सध्या राज्यात विरोधकांकडून घमासान सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि रोजगार दुसऱ्या राज्यात जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. असं असताना गौतम अदानी आणि अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.