ऑनलाईन टीम/तरुण भारत
ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) पुन्हा एकदा भारताचे अॅटर्नी जनरल (Attorney General of India) बनू शकतात. त्यांचा दुसरा कार्यकाळ १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. २०१४ ते २०१७ या केंद्रातील मोदी सरकारच्या पहिल्या ३ वर्षात मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र, जून २०१७ मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव अॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी खासगी प्रॅक्टिस सुरू केली. केके वेणुगोपाल (K K Venugopal) यांची जागा मुकुल रोहतगी घेतील.
२०२० मध्ये त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, वेणुगोपाल यांनी त्यांचं वय लक्षात घेऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सरकारला केली होती. परंतु, सरकारनं वेणुगोपाल यांना पुढील कार्यकाळासाठी काम करण्यास सांगितलं. सरकारच्या विनंतीनंतर वेणुगोपाल यांनी आणखी दोन वर्ष या पदावर राहण्याचं मान्य केलं. मुकुल रोहतगी १ ऑक्टोबरपासून अॅटर्नी जनरल म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केलं आहे. २०१७ मध्ये रोहतगी यांच्या राजीनाम्यानंतरही सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यासह इतरही अनेक संवेदनशील मुद्द्यांवर त्यांचा सल्ला घेतल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, सध्याचे अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल (KK Venugopal) यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. ९१ वर्षीय वेणुगोपाल आता या पदावर राहण्यास इच्छुक नसल्याचं सुत्रांकडून सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेणुगोपाल यांच्यानंतर अॅटर्नी जनरल म्हणून मुकुल रोहतगी पदभार स्विकारणार आहेत. परंतु, रोहतगी यांच्या नियुक्तीसंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.