वृत्तसंस्था/ बेंगळूर
2022 रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबईने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. येथे या स्पर्धेतील सुरू असलेल्या मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील पाच दिवसांचा उपांत्य सामना अनिर्णित राहिला. मुंबईने पहिल्या डावातील 213 धावांच्या आघाडीमुळे अंतिम फेरीत प्रवेश केला. आता मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
मुंबई संघाने आतापर्यंत या स्पर्धेत आपली मक्तेदारी राखताना 41 वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले. मुंबईने या स्पर्धेत 47 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. या उपांत्य सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 393 धावा जमविल्यानंतर उत्तरप्रदेशचा पहिला डाव 180 धावांत आटोपला. मुंबईने पहिल्या डावात उत्तरप्रदेशवर 213 धावांची आघाडी मिळविली. मुंबईने 4 बाद 449 या धावसंख्येवरून आपल्या दुसऱया डावाला शनिवारी पुढे सुरूवात केली आणि त्यांनी दिवसअखेर दुसऱया डावात 4 बाद 533 धावा जमविल्या. हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला.
येथे शुक्रवारी रात्री पाऊस झाल्याने मैदान आणि खेळपट्टी ओलसर राहिल्याने शेवटच्या दिवशीच्या खेळाला उपाहारानंतर प्रारंभ झाला. सर्फराज खान आणि मुलानी यांनी आपली अर्धशतके झळकविल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. सर्फराज खानने 3 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 59 तर मुलानीने 6 चौकारांसह नाबाद 51 धावा जमविल्या. आता मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील अंतिम सामना 22 जून पासून चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. मुंबईचे माजी क्रिकेटपटू अमोल मुजूमदार आणि चंद्रकांत पंडित हे सध्या अनुक्रमे मुंबई आणि मध्य प्रदेश संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत.
संक्षिप्त धावफलक
मुंबई प. डाव- 393, उत्तर प्रदेश प. डाव सर्वबाद 180 (मावी 48, कौशिक 38, तुषार देशपांडे 3-34), मुंबई दु. डाव -4 बाद 533 (यशस्वी जैस्वाल 181, अरमान जाफर 127, सर्फराज खान नाबाद 59, मुलानी नाबाद 51, प्रिन्स यादव 2-92, मावी 1-36 सौरभ कुमार 1-113).