ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यभरात दहीहंडीचा (Dahihandi) उत्सव जल्लोषात सुरू असताना मुंबईतील बोरिवली पश्चिममध्ये चार मजली इमारत कोसळल्याचे (Borivali Building Collapse) वृत्त समोर आले आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
मुंबईत (Mumbai) सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना बोरिवलीत दुपारी चार मजली इमारत कोसळली. बोरिवली पश्चिमेला असलेल्या साईबाबा नगरातील ही इमारत आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. साईबाबा मंदिराजवळ असलेली गीतांजली ही चार मजली इमारत अचानक कोसळली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि पोलीस पथक दाखल झाले आहे. दुपारी पाऊणच्या सुमारास अग्निशमन दलाने दुर्घटनेचा स्तर दोन असल्याचे जाहीर केले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का? याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही.
बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगरात असणारी गीतांजली सोसायटीतील ही चार मजली इमारत सुमारे ३५ वर्षे जुनी होती. या इमारतीत १२ ते १५ कुटुंबं राहत होती. धोकादायक घोषित करण्यात आल्यानं इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळं अनर्थ टळला आहे. असं असलं तरी कोणी ढिगाऱ्याखाली अडकलं तर नाही ना, याचा शोध अग्निशमन जवानांकडून घेतला जात आहे.
हे ही वाचा : CBI Raid : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचे छापे
स्थानिक आमदार सुनील राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या पुनर्विकासासाठी बोलणी सुरू होती. आज सकाळीच इमारतीतील लोकांनी घरं खाली केली होती. त्यानंतर ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे.