चालू वर्षात आतापर्यंत 100 दहशतवादी ठार
श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये वर्षभरात सातत्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवाया सुरू आहेत. या कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाकडून केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 2022 च्या पहिल्या पाच महिने आणि 12 दिवसात सुरक्षा दलांनी 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यावषी आतापर्यंत खोऱयातील विविध भागात झालेल्या चकमकीत 71 स्थानिक आणि 29 विदेशी दहशतवादी मारले गेले आहेत, असे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सोमवारी सांगितले.
सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, यावषी एकूण 61 चकमकी झाल्या. या संघर्षात लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या 63 दहशतवाद्यांना आणि जैश-ए-मोहम्मदच्या 24 दहशतवाद्यांना ठार केले. तसेच 47 दहशतवादी आणि त्यांच्या 185 मदतनीसांना अटक करण्यात आल्याचेही विजय कुमार यांनी स्पष्ट केले. या चकमकींचा सर्वसामान्य नागरिक आणि सुरक्षा दलालाही फटका बसला आहे. चकमकीदरम्यान झालेल्या गोळीबारात 17 नागरिक ठार झाले असून पोलीस आणि लष्कराचे 16 जवान हुतात्मा झाले आहेत. गेल्या वषी याच कालमर्यादेत दहशतवाद्यांच्या मृत्यूची संख्या केवळ 50 वर पोहोचली होती. यामध्ये 49 स्थानिक दहशतवादी आणि 1 विदेशी दहशतवाद्याचा समावेश होता.
आदिलच्या चकमकीने ‘शतक’ पूर्ण
लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आदिल परेचा याच्या खात्म्यानंतर दहशतवाद्यांच्या मृत्यूने ‘शंभरी’ पूर्ण केली. आदिलचा जम्मू-काश्मीरमध्ये दोन पोलीस कर्मचाऱयांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग होता. श्रीनगरच्या क्रिस्बल पालपोरा संगम भागात दहशतवादी आणि श्रीनगर पोलिसांच्या पथकासोबत चकमक झाली. यात आदिलचा खात्मा करण्यात आला.
मागील वर्षी 171 दहशतवाद्यांचा खात्मा
मागील वर्षी म्हणजे 2021 मध्ये सुरक्षा दलांकडून 171 दहशतवादी मारले गेले होते. मृतांमध्ये 19 पाकिस्तानी दहशतवादी आणि 152 स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश होता. याचदरम्यान 34 स्थानिकांना आपला जीव गमवावा लागला होता. दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीच्या रायफलसह बरीच शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता. राज्यात आणि सीमारेषेवर करण्यात आलेल्या कारवायांमध्ये मुख्यत्वे करून पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सहभाग स्पष्ट झाला होता.
स्थानिक मुलांना प्रशिक्षण
सीमेच्या पलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, दहशतवादी संघटना 15 ते 16 वयोगटातील मुलांची भरती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. सदर मुलांना छुप्या पद्धतीने प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न स्थानिक म्होरक्यांकडून केला जात आहे.