ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा याकरता शिवसेनेने (Shivsena) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने मागितलेली परवानगी महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेनेची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली. आधीच्या याचिकेत मुंबई महानगरपालिकेला परवानगीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. शिवाय शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीची परवानगीही मागण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने ठाकरे गटाला सुधारित याचिका करण्याची परवानगी दिली.
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र, आता ती याचिका उद्यावर ढकलण्यात आली आहे. तसेच, सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेनेची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे या प्रकरणातील सर्व कागदपत्र शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहेत, अशी माहिती माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली. आज त्यांनी माध्यमांशी चर्चा केली.
हे ही वाचा : मुलं पळवणारी टोळी ऐकली, पण बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार – उद्धव ठाकरे
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं म्हणत मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलं आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार, शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी अशी याचिका शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. तर, आम्हीच खरी शिवसेना अशी मध्यस्थी याचिका शिंदे गटाकडून आज करण्यात आली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती, मात्र ती सुनावणी आता उद्यावर ढकलली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या याचिकेवर शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
खरी शिवसेना कोण हे काल कळलं
कालच्या मेळाव्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कोण काय बोलतंय याकडे आमचं लक्ष नाही. आमचं लक्ष कामाकडे, मुंबईकरांकडे आहे, असं अनिल परब म्हणाले. तसंच, आम्हीच खरी शिवसेना असा दावा करणाऱ्या शिंदे गटालाही त्यांनी लक्ष्य केलं. ते म्हणाले की, खरी शिवसेना कोण हे कालच्या गर्दीमुळे कळलंच असेल, असं अनिल परब म्हणाले.