वृत्तसंस्था /बेंगळूर
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात गुरूवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर उत्तरप्रदेशविरूद्ध मुंबई संघाने 346 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. दिवसअखेर मुंबईने दुसऱया डावात 1 बाद 133 धावा जमविल्या होत्या.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 393 धावा जमविल्या. मुंबई संघातील जैस्वाल आणि तमोरे यांनी शानदार शतके झळकविली तर मुलानीने अर्धशतक नोंदविले. उत्तरप्रदेशतर्फे करण शर्माने 4, सौरभ कुमारने 3, दयालने 2 गडी बाद केले. त्यानंतर उत्तरप्रदेशने पहिल्या डावात 180 धावा जमविल्या. मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर उत्तरप्रदेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. उत्तरप्रदेशच्या डावामध्ये मावीने दोन षटकार आणि चार चौकारांसह 48, कौशिकने 1 षटकार आणि पाच चौकारांसह 38, कर्णधार करण शर्माने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27, प्रिन्स यादवने 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. मुंबईतर्फे तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि कोटीयान यांनी प्रत्येकी 3 तर धवल कुलकर्णीने 1 गडी बाद केला. मुंबईने पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळविली.
त्यानंतर मुंबईने आपल्या दुसऱया डावात 42 षटकांत 1 बाद 133 धावा जमविल्या. कर्णधार पृथ्वी शॉने आक्रमक फलंदाजी करताना 12 चौकारांसह 64 धावा जमविल्या. जैस्वाल आणि शॉ यांनी सलामीच्या गडय़ासाठी 66 धावांची भागिदारी केली. शॉ बाद झाल्यानंतर जैस्वाल आणि जाफर यांनी दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 67 धावांची भागिदारी केली. जैस्वाल एक षटकार आणि 5 चौकारांसह 35 तर जाफर 5 चौकारांसह 32 धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक मुंबई प. डाव 140.4 षटकांत सर्वबाद 393, उत्तरप्रदेश प. डाव- 54.3 षटकांत सर्वबाद 180 (मावी 48, कौशिक 38, करण शर्मा 27, प्रिन्स यादव 20, तुषार देशपांडे, अवस्थी, कोटीयान प्रत्येकी तीन बळी, धवल कुलकर्णी 1 बळी), मुंबई दु. डाव- 42 षटकांत 1 बाद 133 (पृथ्वी शॉ 64, जैस्वाल खेळत आहे 35, अरमान जाफर खेळत आहे 32, सौरभ कुमार 1-32).