ऑनलाईन टीम/तरुण भारत
मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. कधीही महाविकास आघाडी सरकार कोसळू शकतं. यातच राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे. (Maharashtra Political Crisis)
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत काही आमदारांचे कार्यालय फोडले आहेत. तर काही ठिकाणी बॅनर लावले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत १४४ सीआरपीसी अनुसार जमावबंदीचे आदेश राज्याच्या पोलीस विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तसेच कुणीही कायदा हातात न घेण्याच्या राजकीय पक्षांना सुचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : मी मोदींचे दु:ख जवळून पाहिले, आज सत्य सोन्यासारखे बाहेर आले – अमित शाह
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३० जूनपर्यंत मनाई आदेश
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकीय परिस्थितीचा प्रभाव दिसू शकतो, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ३० जून २०२२ पर्यंत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनाई आदेश लागू राहणार आहेत.