केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या मुंबई दौऱ्याचा मुख्य उद्देश हा मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणं हा असून, त्यासाठी ते मुंबईत महत्त्वाच्या बैठका घेत आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या निवासस्थानी शाहंची बैठक सुरू आहे. या बैठकीत शाह यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. दोन सीटसाठी शिवसेनेने 2014 मध्ये युती तोडली. धोका देणाऱ्यांना कधीही सहन करु नका. आता मुंबईतल्या राजकारणावर केवळ भाजपचे वर्चस्व असलं पाहिजे. ती वेळ आता आली असून, उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली पाहिजे, असे शाह यांनी म्हटले आहे.
शाह म्हणाले, शिवसेनेने केवळ दोन जागांसाठी युती तोडली. भाजपने कधीही छोटा भाऊ, मोठा भाऊ म्हटले नव्हते. शिवसेनेची जी अवस्था झाली आहे, त्याला शिवसेनाच कारणीभूत आहे. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. अन् भाजपला धोका दिला. राजकारणात सगळं काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. मुंबईच्या राजकारणावर भाजपचं वर्चस्व राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं आहे, असंही ते म्हणाले.
अधिक वाचा : संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला
फडणवीस म्हणाले, मुंबईतली ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढा. असे माना आणि अभी नही तो कभी नही. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले.
दरम्यान, शाह यांची दुसरी कोअर कमिटीची बैठक मुंबई विमानतळावर 5 वाजता होणार आहे. या बैठकीत प्रदेश कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित असतील. यामध्ये प्रदेश स्थरावरचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, मंत्री गिरीष महाजन, आशिष शेलार यांचा समावेश असणार आहे.