डॉ. कुणाल जाधव यांची माहिती : आजीवन अध्ययन विभागाची सावंतवाडीत कार्यशाळा
वार्ताहर /सावंतवाडी
मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांचे विस्तार कार्य आता घरोघरी पोहोचण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठांतर्गत जवळपास 800 महाविद्यालये आहेत. त्यापैकी 305 महाविद्यालयात आतापर्यंत विस्तार वाढविण्याच्या दृष्टीने विद्यापीठ पोहोचले आहे. अजूनही निम्म्याहून अधिक महाविद्यालये प्रक्रियेत यायची आहेत. आता महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक समाजसेवेच्या माध्यमातून घरोघरी जाणार आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. कुणाल जाधव यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागांतर्गत आरोग्य, पर्यावरण, निसर्ग, शिक्षण आणि मदतकार्य या विषयांकडे आता विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष द्यायला हवे. प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचायला हवे, असा विद्यापीठाचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे नियोजन नीटनेटके आणि उत्कृष्ट असल्याचे ते म्हणाले.
जिह्यातील 37 महाविद्यालयांसाठी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागांतर्गत सावंतवाडीतील देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज येथे विस्तार कार्य वाढवण्याच्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रातील योगदानाबाबत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रभारी संचालक डॉ. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विश्वंभर जाधव, लोकमान्य ट्रस्टचे महेश सातवसे, देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस, ‘तरुण भारत’चे वितरण विभागप्रमुख सचिन मांजरेकर, कुमार सावंत, एस. एम. पाटील, एम. ए. ठाकुर, उमेश परब उपस्थित होते.
यावेळी गवाणकर कॉलेजच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या आजीव अध्ययन विभाग संचालकपदी डॉ. कुणाल जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्राचार्य गवस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 31 महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले, आज ज्या सामाजिक समस्या आहेत, त्यांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांनी घरोघरी पोहोचायला हवे. घरोघरी विद्यापीठ अशी संकल्पना यातून आपल्याला निर्माण करायची आहे.
सामाजिक सेवेकडे वळा!
मुंबई विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक तथा टीव्ही मालिकांचे अभिनेते डॉ. विश्वंभर जाधव यांनी सांगितले की, कोरोना महामारीनंतर आपण आता वेगळ्य़ा मानसिकतेत आलो आहोत. ही मानसिकता बदलून पुन्हा आपण नव्या प्रक्रियेत यायला हवे. यासाठी मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांतर्गत सामाजिक सेवेतून कार्य करण्याचे ठरवले आहे. प्रत्येकाने शरीर सुदृढ ठेवले तर समाजात चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि समाजातील अनेक समस्या आहेत, त्यांचा निपटारा कसा करता येईल, याकडे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पाहायला हवे. मानसिक ताण-तणाव घालवायचा असेल तर योगाभ्यास, व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी आरोग्याकडे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
गवाणकर कॉलेजमध्ये स्किल इंडिया कोर्स केंद्र
स्किल इंडियाचे कुमार सावंत यांनी जिह्यात सावंतवाडीत देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज येथे ऑगस्ट अखेरपर्यंत स्किल इंडिया कोर्स केंद्र सुरू केले जाणार आहे. या माध्यमातून उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, असे स्पष्ट केले.
माणगाव येथे एज्युकेशन हब!
प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी सांगितले की, 12 वर्षांपूर्वी सावंतवाडी येथे देशभक्त शंकरराव गवाणकर आर्टस्, कॉमर्स, मॅनेजमेंट कॉलेज सुरू करण्यात आले. या 12 वर्षात जवळपास आठशेहून अधिक विद्यार्थी आज विविध उद्योग, व्यवसायात करिअर करत आहेत. लोकमान्य ट्रस्टमार्फत हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, बी. एड. तसेच माणगाव येथे एक एज्युकेशन हब निर्माण केला जात आहे.
सूत्रसंचालन साईनाथ पंडित व आभारप्रदर्शन प्रा. अस्मिता गवस यांनी केले. यावेळी मेधा मयेकर, सुखदा कुडतरकर, विभा गवंडे, आनंद नाईक तसेच साळगाव येथील हॉटेल मॅनेजमेंटमार्फत अल्पोपहार व अन्य सहकार्य करण्यात आले. यावेळी उपस्थित 31 महाविद्यालयांच्या प्रतिनिधींचे स्वागतही करण्यात आले.