मिठाशिवाय जेवणाला चव नसते हे खरे असले तरी देखील मिठाचा अतिरेकी वापर आरोग्याला घातकी ठरू शकतो. साधारणतः मानवी शरीराला 6 ग्रॅम मीठ पुरेसे आहे. मात्र मुंबईकर प्रतिदिन सरासरी 9 ग्रॅम मिठाचे सेवन करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. नेमक्या याच कारणामुळे असंसर्गजन्य आजार बळावत आहेत. असंसर्गजन्य आजाराचे गंभीर दुष्परिणाम कोविड काळात दिसून आले. त्यामुळे सजग होऊन मुंबई महानगरपालिका असंसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी सप्टेंबरपासून तपासणी व्यापक मोहिम सुरु करणार असून यातून असंसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी जागरुकतेसाठी मोहिम छेडली जाणार आहे.
कोविड काळात रक्तदाब, मधुमेहासारखे सहव्याधी असणारे रुग्ण मोठय़ा प्रमाणात दगावल्याचे सर्वश्रूत आहे. हे आजार असंसर्गजन्य आजारात मोडत असून संसर्गजन्य आजारांसारखेच हे देखील धोकादायक आहेत. रक्तदाबासारखा आजार अतिरेकी मीठ सेवनातून जडत असतो. या असंसर्गजन्य आजारावरील ‘स्टेप’ सर्वेक्षण मुंबई महानगरपालिका तसेच जागतिक आरोग्य संघटनेने मुंबई पालिका क्षेत्रात केले. या स्टेप सर्वेक्षणात मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास जडल्याचे समोर आले. याचे कारण शोधले असता मुंबईकर आहारात मिठाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करत असल्याचे आढळले. साधारणतः शरीराला 6 ग्रॅम मिठाची गरज असताना मुंबईकर मात्र सरासरी 9 ग्रॅम मीठ प्रतिदिन सेवन करत असल्याचे सर्वेक्षणात आढळले. त्यामुळे 18 ते 69 वयोगटातील 34 टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाब जडल्याचे निदान झाले. उच्च रक्तदाब धोकादायक असून कोविड काळात याचे गंभीर परिणाम दिसून आले. त्यामुळे स्टेप या सर्वेक्षणाचे महत्व अधोरे†िखत होत आहे. तसा इशारा मुंबई महानगरपालिकेकडून देण्यास सुरुवात झाली आहे. स्टेप सर्वेक्षणात मुंबईतील 18 ते 69 वयोगटातील सुमारे पाच हजार मुंबईकरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवाय मुंबईतील बहुतांश वॉर्डात हे सर्वेक्षण करण्यात आले. यात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक असून यातही प्रामुख्याने उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. सर्वेक्षण केलेल्या वयोगटात तीन मुंबईकरांमागे एक मुंबईकर उच्च रक्तदाब ग्रस्त आढळून आला. त्यातही गंभीर बाब म्हणजे रक्तदाबाचे कारण प्रामुख्याने आहारात मिठाचे अतिरेकी सेवन होत असल्याचे आढळले. मुंबईकर दरदिवशी सरासरी 9 ग्रॅम इतके मीठ आहारातून वापरत असल्याचे सर्वेक्षणाचे निरीक्षण मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सर्वेबाबत सांगताना मांडले. याउपर सर्वेक्षणाचे सखोल विश्लेषण अद्याप बाकी असून काही ठळक बाबी समोर येतील असे वाटत असल्याचे डॉ. संजीव कुमार म्हणाले. यापूर्वी 2020 मध्ये मुंबईत सर्वेक्षणाचे दोन टप्पे पार पडले असून तिसरा टप्पा घेण्यात येणार आहे. एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर सध्या असंसर्गजन्य आजार असून तिसऱया टप्प्यातील सर्वेक्षण सप्टेंबरपासून सुरु करण्यात येईल. यात 30 वर्षांवरील मुंबईकरांच्या मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये देखील सज्ज असून या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी एक विशेष पेंद्र सुरू करण्यात येणार आहे. यातून रुग्णासह सरसकट मुंबईकरांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत.
आता पर्यंत आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य तपासणीसाठी येणारे रुग्ण अशांची आरोग्य तपासणी केली जात होती. तसेच 30 हे वय आरोग्य तपासणीसाठी गृहीत धरले जात नव्हते. मात्र या सर्वेक्षणातून रुग्ण, कर्मचारी किंवा कोणताही नागरिक असे निकष धरले जाणार असून 30 व त्यावरील सर्वांची सरसकट आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्याचवेळी रुग्णालयात येणाऱया नागरिकांसह घरोघरी जाऊन आजारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच असंसर्गजन्य आजारांबाबत जागरुकता मोहिम छेडली जाणार आहे. या रुग्णांच्या आजारांची प्रत्येक नोंद करण्यात येणार असून ही माहिती डिजिटल स्वरूपात सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात येणार आहे. त्यातही संशयित रुग्ण, फॉलोअपचे रुग्ण तसेच त्यांच्यावर केलेले उपचार अशी इत्थंभूत माहिती या सॉफ्टवेअरमध्ये नमूद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्य दृष्टीने हे वेगळे सर्वेक्षण राहणार आहे. यात कर्करोगाच्या तपासण्यासहीत मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी उपचार अशी व्यापक मोहीम पूर्ण करण्यात येईल. कर्करोगाच्या तपासणीतही वर्गवारी करण्यात आली असून मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाच्या चाचण्यांची प्राथमिक फेरी घेतली जाईल. मुंबईकरांच्या आरोग्य तपासणीत त्याचे स्थूलपणा, वजन, असले तर कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण यासारख्या बारीकसारीक नोंदी करण्यात येणार आहेत. उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण म्हणजे रोजच्या आहारातून गरजेपेक्षा अधिक होणारा मिठाचा वापर होय. रक्तदाबात अडथळा निर्माण होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे डॉक्टर सांगतात. चवीच्या नावाखाली अनेकदा मिठाचा अतिरेकी वापर केला जातो. तसेच काही पदार्थांमधून शरीराला नैसर्गिक मीठ मिळत असते. असे असताना देखील मिठाचा अतिरेकी वापर मुंबईकर करताना दिसत असल्याचे सर्वेक्षणातून समोर येत आहे.
मुंबईकरांच्या शरीरात आहाराव्यतिरिक्त वरच्या खाण्यातून मीठ अधिक जात असल्याचे निरीक्षण तज्ञ मांडत आहेत. चटपटीत नाश्ता, शेव किंवा फरसाण सारख्या पदार्थांमधून मोठय़ा प्रमाणात मीठ शरीरात जात असते. यात तेलकट पदार्थ प्रामुख्याने असून असे चटपटीत पदार्थ मुंबईकरांनी टाळावेत असा इशारा देण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या असंसर्गजन्य आजारांचा परिणाम दिसून आला. त्यामुळे याचे वेळेत निदान करुन उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी पेंद्रीय आरोग्य विभागाने मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे निदान आणि उपचारावर भर देण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यातूनच या आजारांची तपासणी मोहिम मुंबई पालिका क्षेत्रात केली जाणार आहे. तुर्तास मुंबईकरांनो अतिरिक्त मिठाला नको म्हणा असाच संदेश मुंबई महानगरपालिकेडून या मोहिमेतून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते.
राम खांदारे