पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर दुरूस्ती करणार का? नागरिकांचा सवाल, उन्हाळ्यात कूपनलिकांचा आधार
प्रतिनिधी /बेळगाव
पाणीटंचाईच्या काळात विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे विविध विहिरींचे पुनऊज्जीवन महापालिकेने केले आहे. मात्र जलसाठा असलेल्या वडगाव नाझर कॅम्प येथील विहीर कोसळून चार वर्षे झाली, पण विहिरीची दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने महापालिका आणि एल अॅण्ड टी कंपनीने कोणतीच दखल घेतली नाही. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतरच विहिरीची दुरुस्ती करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शहरवासियांना राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे हिडकल जलाशयातील पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनीची दुरुस्ती, विद्युतपुरवठा खंडित झाल्यास किंवा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास शहरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. पाणीटंचाईच्या काळात विविध ठिकाणी असलेल्या विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी पुरविले जाते.
विहीर पूर्णपणे ढासळल्याने समस्या
मध्यंतरी राकसकोप जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने डेड स्टोअरेजमधील पाणीपुरवठा केवळ पिण्यापुरता केला जात होता. तसेच दैनंदिन वापरासाठी कूपनलिका व विहिरींचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. अशावेळी पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने शहर आणि उपनगरात असलेल्या विहिरींचे पुनऊज्जीवन केले होते. बुजविण्यात आलेल्या विहिरींची खोदाई करून जलशुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण नाझर कॅम्प वडगाव येथील व्यवस्थित असलेली विहीर ढासळल्याने पूर्णपणे कोसळली आहे. विहीर कोसळून चार वर्षे झाली. पण अद्याप दुरुस्तीच्या दृष्टीने मनपाकडून कोणतीच कारवाई नाही. विहिरीच्या दुरुस्तीसाठी निविदा काढणार असल्याचे सांगण्यात आले. पण अद्यापही निविदाच काढल्या नाहीत.
गणपती विसर्जन तलावालाही धोका
नागरिकांच्या माहितीनुसार सदर विहिरीत भरपूर पाणीसाठा होता. वडगाव परिसरातील विविध गल्ल्यांना सदर विहिरीचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण सध्या ही विहीर पूर्णपणे कोसळली असून, शेजारी असलेल्या गणपती विसर्जन तलावाला देखील धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी असलेली जलशुद्धीकरण यंत्रणा पाणीपुरवठा मंडळाने त्यावेळी काढली होती. विहिरीभोवती तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. पण दुरुस्तीच्या दृष्टीने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे विसर्जन तलाव आणि शेजारच्या इमारतीला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे विहिरीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.