सुस्थितीतील गटारींचे बांधकाम करण्याची गरजच काय? : नागरिकांचा सवाल
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहर आणि उपनगरांतील गटारींचे बांधकाम व इतर विकासकामे राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत पीऍण्डटी हाऊसिंग सोसायटीमधील गटारीचे बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र, येथील सुस्थितीत असलेल्या गटारीचे बांधकाम करण्याचा विचार चालविला आहे. त्यामुळे सुस्थितीतील गटारींचे बांधकाम करण्याची गरजच काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
परिसरात एका मोठय़ा वृक्षामुळे गटारीचे नुकसान झाले असून गटार कोसळत चालली आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र, परिसरातील काही रहिवाशांनी गटारीवर काँक्रीट घालून व्यवस्थित केले असल्याने गटारी सुस्थितीत आहेत. गटारीमध्ये कचरा किंवा झाडाची पाने पडत नसल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास कोणतीच अडचण निर्माण होत नाही. पण कोसळलेल्या गटारीसह सुस्थितीत असलेल्या गटारीचे बांधकाम करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अभियंत्यांनी येथील रहिवाशांना दिली आहे.
चांगल्या गटारी तोडून नवीन करण्याची गरज काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सुस्थितीत असलेल्या गटारीचे बांधकाम करण्याऐवजी खराब झालेल्या गटारीचे बांधकाम करण्यात यावे, अशी विनंती नागरिकांनी केली आहे. चांगल्या गटारी फोडून नव्या करण्यासाठी निधी वाया घालण्याऐवजी खराब झालेल्या गटारींचे बांधकाम केल्यास निधीचा योग्य विनियोग होईल.
या परिसरात दुसऱया बाजूच्या गटारीचे बांधकाम करण्यात आले नाही. ठिकठिकाणी गटार कोसळली आहे. एकाच ठिकाणच्या गटारी करण्यासाठी निधी खर्च करण्याऐवजी सुस्थितीत असलेली गटार वगळून केवळ खराब झालेल्या गटारीचे बांधकाम करण्यात यावे. गटार खराब होण्यास कारणीभूत असलेले वृक्ष हटविण्यात यावेत, तसेच येथील गटारीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.