पुणे : देशाची संस्कृती भगवान महावीर, गौतम बुद्ध, भगवदगीता तत्वज्ञान यावर आधारित जागतिक कल्याणाची आहे. परंतु, जगातील आजची स्थिती तणावपूर्ण असून, रशिया आणि युक्रेन यांच्यात विध्वंसक युद्ध सुरू आहे. विश्व कल्याणचा विचार भारतीय संस्कृतीमध्ये असून, विवधतेत एकता हे आपले वैशिष्टय़ आहे. आजच्या काळात मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीचे आचरण करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जितो कनेक्ट 2022′ मध्ये ते बोलत होते. गडकरी म्हणाले, जैन शब्द हा जीन अर्थात इंद्रियांना जिंकणारा असा होतो. जीवनात संकट, समस्या अनेक येतात. परंतु समस्यांना संधीत रूपांतरित करून त्याचा उपयोग करण्याची ताकत जैन समाजात आहे. सत्य, अहिंसा, क्षमाशील राहणे हे जैन धर्माचे आधारभूत तत्वज्ञान आहे. त्याचप्रमाणे देशाला सुपर पॉवर बनविण्याची ताकत सुद्धा जैन समाजात आहे. हा समाज नोकरी मागणारा नसून नोकरी देणारा आहे. या समाजाच्या लोकांत व्यापार गुण मुरलेला आहे. भगवान महावीर यांनी सत्य, अहिंसा, पशुबळी बंदी, गरजूंना मदत करणे, निस्वार्थ भावना, विनम्रता ही शिकवण दिलेली असून, त्याचे आचरण हे विश्व कल्याणाचे सार आहे. परिश्रम, त्याग, बलिदान यामुळे इतिहास घडत असतो. जगात आतंकवाद पसरतो आहे, एकमेकांना संपवले जात आहे. त्यामुळे जैन धर्माच्या पंचशील तत्वाचे अनुकरणाची गरज आहे. देशाचे निर्माणासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. जगाची काळजी करताना आपण देशाची ही काळजी करावी लागते. आत्मनिर्भर भारत करीता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेली स्वदेशी वस्तू वापरण्याचा मंत्र प्रत्यक्ष अमलात आणला गेला पाहिजे. 21 वे शतक भारताचे असून आपण त्यादृष्टीने प्रयत्नशील राहावे. आपल्याकडे किती साधन संपत्ती आहे. यापेक्षा आपण कुटुंबातील सदस्य एकमेकांना किती समजून घेत एकत्रित राहतो ही बाब महत्वपूर्ण आहे.
यावेळी उद्योजक प्रकाश धारीवाल, नरेंद्र बालडोटा, आमदार माधुरी मिसाळ, उद्योजक हेमंत जैन, विनोद मुनोत, शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते.