सोशल मीडियावर काळय़ादिनाची जागृती
बेळगाव / प्रतिनिधी
माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली
अशी छक्कड लिहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रापासून दुरावलेल्या बेळगावची व्यथा मांडली होती. आज 66 वर्षे झाली तरी येथील जखमा भळभळत्या आहेत. 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून आजही महाराष्ट्रात जाण्याची उमेद प्रत्येक सीमावासियाच्या हृदयात आहे. त्यामुळेच येणाऱया काळय़ादिनामध्ये मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शवून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले जाईल असा विराट मोर्चा काढावा, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे.
1 नोव्हेंबर रोजी बेळगाव महाराष्ट्रातून वेगळे करून म्हैसूर प्रांताला जोडण्यात आले. त्यावेळच्या केंद्र सरकारने घाईगडबडीत घेतलेला निर्णय सीमावासियांसाठी 66 वर्षे वेदना देत आहे. आपल्या मातृभाषेच्या राज्यात सामील व्हावे, ही एकच इच्छा येथील नागरिकांची आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह अशी 865 गावे कर्नाटकात डांबण्यात आली खरी, परंतु हृदयात मात्र मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रच आहे. अनेक वादळे आली, संकटे आली, मराठीचा झेंडा घेऊन जाणाऱया म. ए. समितीची पिछेहाट झाली. परंतु महाराष्ट्रात जाण्याची इच्छा काही कमी झाली नाही. त्यामुळे गावागावात काळय़ादिनानिमित्त काढण्यात येणाऱया मूक सायकल फेरीसाठी जागृती होत आहे.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सायकल फेरी काढता आली नाही. परंतु यावषी हजारेंच्या संख्येने उपस्थिती लावून केंद्र सरकारचा निषेध केला जाणार आहे. एकीकडे कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करत असताना दुसरीकडे मराठी भाषिक निषेध व्यक्त करत काळादिन पाळतात. त्यामुळे यावषीचाही काळादिन भव्य प्रमाणात पाळून आजही आपला भाषावार प्रांतरचनेला विरोध आहे, हे दाखवून देण्यात येते. प्रत्येक विभाग समितीकडून जागृतीपर बैठका घेण्यात आल्या असून, मराठी भाषिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर जागृती
काळय़ादिनासाठी अजून दोन दिवस असताना आतापासूनच निषेधाचे फलक समाज माध्यमांवर झळकू लागले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच मराठी भाषिक आपल्या व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक या माध्यमातून काळय़ादिनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. ‘यायला लागतंय’ ‘माझी मैना गावाकडं राहिली’ असे संदेश पाठविण्यात येत आहेत.