ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे N-95 मास्क हे कोरोना संक्रमण रोखण्यात अपयशी ठरले आहे. हा मास्क कोरोना विषाणूला बाहेर पडण्यापासून रोखू शकत नाही, असे भारत सरकारचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ राजीव गर्ग यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कळवले आहे.
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये N-95 हा मास्क महत्वाचा मानला जातो. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि कोरोना योद्धे हाच मास्क वापरतात. मात्र, हा मास्क कोरोना विषाणूला बाहेर पडण्यापासून रोखू शकत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबतची माहिती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे कळविण्यात आली आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आतापर्यंत 11 लाख 55 हजार 191 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 7 लाख 27 हजार 578 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही 4 लाख 02 हजार 529 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. मृतांची एकूण संख्या 28 हजार 084 एवढी आहे.