ऑनलाईन टीम/तरुण भारत
“भाजपाला सत्तेच्या बाहेर जायची जेव्हा वेळ येते, तेव्हा तेव्हा गांधी, नेहरु परिवाराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या दिवशी भाजप गांधी परिवाराला (Gandhi Family) हात लावण्याचा प्रयत्न करेल त्यादिवशी महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातला काँग्रेस कार्यकर्ता आणि सामान्य माणूस पेटून उठेल, असा घणाघात काँग्रेस नेते नाना पटोले (Congress leader Nana Patole) यांनी केला आहे. धनगर समाज कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त नाना पटोले आज अमरावतीत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“भाजप सरकार केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. सातत्याने २०१४ पासून आपण या सरकारची भूमिका पाहिली आहे. तरीही ते गांधी परिवाराला साधा हातही लावू शकत नाहीत. या परिवाराच्या त्यागाची भूमिका या देशातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे. ज्या दिवशी हे लोक गांधी परिवाराला हात लावण्याचा प्रयत्न केला जाईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रासह देशातला काँग्रेस कार्यकर्ता आणि सामान्य माणूस (Common Man) पेटून उठेल. त्यामुळे त्यांच्या वाट्याला जाऊ नका असा सल्ला केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे, असं नाना पटोले म्हणाले.
उदयपूरमध्ये (Udaipur) झालेल्या चिंतन शिबिरात सोनिया गांधी यांनी देशात धर्मांधता वाढत चालली आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वाक्याला सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही समर्थन केलं आहे. त्यामुळे आम्ही मोहन भागवत यांच्या भूमिकेचं स्वागत करतो, असंही नाना पटोले म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना पटोलेंनी सांगितले की, “राज्यसभेच्या निवडणुका या नेहमीच बिनविरोध होत असतात. ही महाराष्ट्राची परंपरा राहली आहे. त्यासाठी प्रयत्न झाले. पण, तरीही आमच्या चारही जागा निवडून येतील,” असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला.