सत्तेसाठी धर्माचं राजकारण होतंय-नाना पटोले
मुंबई: मुंबईतील वाॅर्ड पुर्नरचनेवर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. सोयीनुसार वाॅर्ड पुर्नरचना होत असल्यास कोर्टात जाण्याचा इशारा आज माध्यमांशी बोलताना त्यांनी दिला. यावेळी त्यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिले आहे.
नाना पटोले म्हणाले, सर्व पक्षांनी मिळून याबाबत विचार होणे गरजेचे आहे. पुण्यात, मुंबईत महाविकास आघाडीताल काही पक्ष स्वत:च्या मनाप्रमाणे कारभार करत आहेत. आमची दोन प्रभागाची मागणी असताना तीन प्रभाग करण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक ठिकाणी आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे. तिघांच सरकार असताना निर्णय मिळूनच घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मित्रपक्षांचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. दरवर्षी मुंबई पावसाळ्यात पाण्याखाली जाते त्यामुळे जनतेसाठी काॅंग्रेस कोर्टात गेली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मविआची संयुक्त चर्चा झाली नसल्याचेही ते म्हणाले. महागाईच्य़ा मुद्दावर चर्चा का करत नाही असा सवालही त्य़ांनी यावेळी केला.
ज्ञानव्यापीच्या मुद्यावरून बोलताना पटोले म्हणाले, त्या विषयात आम्हाला पडायचे नाही. जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. काही लोक सत्तेसाठी मंदिर-मस्जिद चा वापर करत आहेत. राजकारणात धर्म आणू नये, देशाचा विकास करणे ही भूमिका काॅंग्रेसची आहे. देशाला महासत्ता बनवण्याची भूमिका असल्याचे पटोले म्हणाले.