गुजरातमध्ये काँगेसच्या आशांवर पडले विरजण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये ज्या नरेश पटेल यांच्यावर काँगेसच्या आशा टिकून होत्या, त्यांनी राजकारणात प्रवेश करण्यास नकार दिला आहे. हा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. नरेश पटेल हे पाटीदार समाजातील प्रभावी नेते आहेत. त्यांनी काँगेसमध्ये यावे यासाठी त्या पक्षाने बरेच प्रयत्न चालविले होते. तथापि, पटेल यांनी काँगेसचा पस्ताव नाकारला आहे.
काही दिवसांपूर्वी नरेश पटेल यांनी काँगेस नेते राहुल गांधी आणि निवडणूक अभ्यासक प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हापासून ते काँगेसमध्ये येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. ते काँगेसमध्ये आल्यास काँगेसला राजकीयदृष्टय़ा प्रभावी पाटीदार समाजात महत्व मिळेल अशी अटकळ होती.
राजकारण क्षेत्र नाही
मात्र, राजकारण हे आपले क्षेत्र नसून आपण समाजकार्यातच राहणार आहोत, असे पटेल यांनी गुरुवारी स्पष्ट केले. राजकारण करावे का. यासंबंधी जनतेचे मत जाणून घेण्यासाठी पटेल यांनी एक सर्वेक्षण घेतले होते. त्यात पाटीदार समाजाच्या 100 टक्के बुजुर्गांनी त्यांनी राजकारणात येऊ नये असा कौल दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवक आणि महिला यांनी मात्र, त्यांनी राजकारणात जावे असा कौल 80 टक्के इतक्या प्रमाणात दिल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तथापि, आपण बुजुर्गांचा कौल मानणार आहोत. राजकारणात येणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
35 जागांवर प्रभाव
सौराष्ट्र भागातील 35 जागांवर नरेश पटेल यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. या जागांवर कोण जिंकणार हे, नरेश पटेल कोणाला पाठिंबा देतात यावर अवलंबून असते, असेही बोलले जाते. त्यामुळे काँगेसने त्यांच्या काही अटी मानण्याची तयारी दर्शविली होती. तथापि, त्यांनी हा निर्णय घेतल्यास काँगेसच्या पदरी निराशा आली आहे ,अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी पाटीदार समाजाचे आणखी एक नेते हार्दिक पटेल यांनीही काँगेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.