शंभर शहरांच्या समस्या, उपायांवर चर्चा
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कदंब पठार येथील डबल ट्री येथे दोन आयोजित केलेल्या डेटा आणि तंत्रज्ञानावरील 100 स्मार्ट सिटीजच्या सीईओंच्या परिषदेला काल सोमवारी सुरवात झाली असून, ही परिषद मंगळवारपर्यंत चालणार आहे. या परिषदेचे गोव्यात आयोजन करण्यात आल्याने राज्यातील शहरांसाठी ही परिषद लाभदायी ठरण्याची चिन्हे आहेत.
परिषदेच्या पहिल्या दिवशी तीन सत्रांत शहराच्या विकासासंबंधी चर्चा करण्यात आली. यात शंभर शहराच्या सीईओजनी भाग घेत आपापल्या शहराचे नियोजन, विविध समस्या, आवश्यक गोष्टींची कमतरता याविषयी चर्चा केली. शहरे स्मार्ट बनविताना आवश्यक असणाऱ्या गोष्टी या डाटा पद्धतीने तज्ञांनी मांडल्या. याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे शहरांचा विकास कशापद्धतीने साधला जाऊ शकतो, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांत तुंबणारी शहरे व निर्माण होणारी समस्या यावर कशा पद्धतीने मात करता येईल, हे तंत्रज्ञानासहीत परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
शहरांच्या विकासाबाबत मार्गदर्शन
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरांचा विकास करताना नागरिकांची सुरक्षितता, शहरांचे मूळ अस्तित्व (ढाचा) यावरही उपस्थितांनी चर्चा केली. शहरातील गुंतातुंत वाढल्यामुळे आज माणसांच्या जीवनावर परिणाम होण्याबरोबरच वेळेचा अपव्ययही कसा रोखला जाऊ शकतो, यावर मार्गदर्शन केले. शहरांचे सूत्रबद्धरित्या नियोजन झाले आणि त्यानुसार शहरे स्मार्ट बनली तर प्रवासाचा वेळ वाचेल, शिवाय शहरातील प्रदूषणही रोखले जाऊ शकेल या उपायांवरही मार्गदर्शन केले. त्यासाठी काही धोरणे व उद्दिष्ट्यो आखावी लागतील, असे मत चंदीगढ शहराच्या सीईओ स्वाती देसाई यांनी व्यक्त केले.
विविध शहर विकासाची दिली माहिती
परिषदेच्या पहिल्या दिवशी सुमारे तीन सत्रे झाली. त्यापैकी पहिल्या सत्रात ठाणे स्मार्ट सिटी यांच्यातर्फे सुरवात करण्यात आली. ठाणे शहराबाबत सीईओ संदीप माळवी यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. त्यानंतर सीईओ रंगास्वामी आणि आयसीटी मॅनेजर दत्तास्मिता यांनी तुमकुरू शहराचे सादरीकरण केले. आगरताळाचे सीईओ मोहम्मद साजद यांनी आगरताळा शहराची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली. बिलासपूर शहराचे आयटी तज्ञ वाय. श्रीनिवास यांनी बिलासपूर शहराबाबतची माहिती सादर केली.
पावसाळ्यातील परिस्थितीवर प्रकाशझोत
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात चंदीगढ शहराचा सुयोनियोजित विकास व पर्यटनदृष्ट्या महत्त्व अधोरेखित करताना शहराचा झालेला बदल याविषयी माहिती सीईओ अनंदिता मित्रा यांनी दिली. पावसाळ्यात जनजीवनावर होणारा परिणाम आणि त्यावर कशापद्धतीने मात करण्यात आली याची माहिती सुरत शहराच्या सीईओ स्वाती देसाई यांनी दिली. आयटी तज्ञ जीगर पटेल यांनी सुरत शहराचा नियोजनपद्धतीने केलेली आखणी याविषयी परिषदेत माहिती दिली. राजपूर शहराचे प्रात्यक्षिक सीईओ उज्वल पोरवाल यांनी दिली. वाराणसी स्मार्ट शहराबाबची माहिती व नियोजन याविषयी सीईओ प्रणय सिंग यांनी माहिती दिली. आयटी मॅनेजर राहुल तिवारी यांनी शहराच्या आराखड्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
परिषदेच्या तिसऱ्या सत्रात अहमदाबाद स्मार्ट महापालिका (रामय्या भट्ट – सीईओ), पुणे स्मार्ट शहर (डॉ. संजय कोलते – सीईओ), प्रयागराज शहर (चंद्रा मोहन गर्ग, सीईओ), अमृतसर स्मार्ट सिटी (संदीप ऋषी, आएएस अधिकारी), चेन्नई शहर (राजेश्वरी, आयसीसीसी नोडल ऑफिसर), तिऊप्पूर शहर (डी. सौदामिनी, सीईओ), ग्वालीयर शहर (विरेंद्र कुमार शाक्य, सीडीओ) यांनी भाग घेतला.