प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्रीय जंत निवारण दिन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत, शिक्षण विभाग, महिला व कुटुंब कल्याण विभाग, तालुका आरोग्याधिकारी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी महांत भवन महांतेशनगर, बेळगाव येथे पार पडला. 10 ऑगस्ट हा राष्ट्रीय जंत निवारण दिन आहे. त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक हणमंत कोंगाली यांनी केले.
वर्षातून दोन वेळा जंताची गोळी देण्यात येते. मुलांचे आरोग्य सांभाळण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. विविध आजारांपासून मुक्त करण्यासाठी ही योजना राबविली जाते. अंगणवाडी आणि शाळेतील मुलांना जंत निवारण गोळय़ा दिल्या जातात. त्यासाठी जनजागृतीही केली जाते. यावेळी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ म्हणाले, केवळ लहान मुलांनाच नाही तर मोठय़ा व्यक्तीनेसुद्धा जंताची गोळी घेतली पाहिजे. त्यामुळे निश्चितच इतर आजार कमी होऊ शकतात.
बेळगाव शहर क्षेत्रशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, डॉ. चेतन कंकणवाडी यांनीही विचार व्यक्त केले. तालुका आरोग्याधिकारी शिवानंद मास्तीहोळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बसवराज मिलानट्टी, शिवाजी माळगेण्णावर, सी. एस. सुकसारे, लक्ष्मण बजंत्री, आर. सी. मुदकनगौडर, नगरसेविका लक्ष्मी राठोड, रेखा हुगार, राजशेखर डोणी, ऍड. बसवराज सुलतानपुरी आदी उपस्थित होते. आरोग्य शिक्षणाधिकारी बसवराज यलीगार यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. जयानंद धनवंत यांनी आभार मानले.