पुणे / प्रतिनिधी :
देशभरातील विद्यार्थ्यांचे मुख्य प्रवाहातील शिक्षण व्यावसायिक कौशल्याशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय श्रेयांक आराखडा सादर केला आहे. या आराखड्याअंतर्गत शालेय शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत श्रेयांक संकल्पना मांडण्यात आली असून, हरकती, सूचना नोंदवण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.
शिक्षण अधिक सर्वसमावेशक आणि परिणामकारक करण्यासाठी उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण एकत्र करण्यावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय श्रेयांक आराखडा तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने तयार केलेला श्रेयांक आराखडा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याअंतर्गत पूर्वप्राथमिक स्तरापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना श्रेयांक प्राप्त करता येतील. उदाहरणार्थ पाचवी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात बाराशे तास पूर्ण करावे लागतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना चाळीस श्रेयांक मिळतील. हे श्रेयांक विद्यार्थ्यांच्या श्रेयांक बँकेत साठवले जातील. ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांना त्यांनी साठवलेल्या या श्रेयांकाचा वापर त्यांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी करता येईल. आठशे तासांसाठी २७ श्रेयांक, एक हजार तासांसाठी ३३ श्रेयांक या पद्धतीने श्रेयांकांची रचना करण्यात आली आहे. ऑनलाइन, डिजिटल आणि मिश्र शिक्षणासाठीही श्रेयांक दिले जातील. श्रेयांक मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन बंधनकारक आहे.
अधिक वाचा : पुण्याच्या कात्रज परिसरात दहा लाखांचे चरस जप्त
नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमाइतकेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला आराखड्यात महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे विज्ञान, सामाजिक शास्त्र, वाणिज्य, कला यातील भेदभाव खोडला जाईल. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्कद्वारे अधिस्वीकृत केले जाईल. त्यामुळे विद्यार्थी अधिक रोजगारक्षम होतील, असे नमूद करण्यात आले आहे.