बेळगाव : जीएसएस कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातर्फे ‘इमर्जिंग ट्रेन्ड्स इन केमिस्ट्री या विषयावर दोनदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. हायलॉक हायड्रोटेक्निकचे चेअरमन दिलीप चिटणीस यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे डॉ. गजानन राशिनकर उपस्थित होते.
प्रारंभी रंजीता हिने स्वागतगीत सादर केले. जीएसएसचे प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. चर्चासत्राचे संयोजक डॉ. संदीप देशपांडे यांनी चर्चासत्राचा हेतू सांगितला. प्रा. रमेश कटांबळे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. यावेळी राशिनकर यांनी विद्यार्थी फक्त शैक्षणिक अभ्यासक्रमात व्यग्र आहेत. मात्र, अशा प्रकारच्या चर्चासत्रांतून सुसंवाद होतो. ज्ञानाची देवाण-घेवाण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्गातून बाहेर येऊन नवीन कौशल्ये शिकायला हवीत, असे सांगितले. दिलीप चिटणीस यांनी परीक्षेसाठी अभ्यास करणे व ज्ञान मिळविणे या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ज्ञान मिळविण्यावर भर द्या, असे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू यांनी ऐकणे, वाचणे, विचारणे या गोष्टी विद्यार्थ्यांना आल्या पाहिजेत, असे सांगितले. प्रा. चारुशीला बाळीकाई यांनी आभार मानले. दुसऱ्या सत्रात विविध परीक्षांसाठी कशी तयारी करावी, याबद्दल डॉ. राशिनकर यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवसाची सुरुवात आयएसओ लॅबच्या भेटीने झाली. आरसीयुचे डॉ. मंजन्ना यांनी ‘नॅनो मेटेरिअल अॅण्ड इट्स बायोमेडिकल अॅप्लिकेशन्स’ या विषयावर तर डॉ. पी. गुरुबसवराज यांनी ‘बायोडिग्रेबल पॉलिमर्स युजिंग ऑर्गेनो मेटॅलिक कॅटॅलिस्ट’ या विषयावर आपले विचार मांडले. तिसऱ्या सत्रात डॉ. गोविंद मिसाळे यांनी इथेनॉल ए वंडर मॉलिक्युल या विषयावर सादरीकरण केले.समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अशोक शानभाग उपस्थित होते. वैष्णवी देसाई व वैष्णवी चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट पेपर सादरीकरणाला बक्षिसे देण्यात आली. प्रा. रमेश कटांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.