केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : पानवेलकर सांस्कृतिक मंडळाचा नाट्यामहोत्सव उत्साहात
तिसवाडी : आपल्या महान संस्कृतीचे जतन करताना कळत नकळत आपल्या हातून देशसेवा घडत असते. भक्तीच्या माध्यमातून केलेल्या देशसेवाला आगळे महत्त्व आहे. त्या कार्यात विशेष बळ, ताकद असते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. पानवेल, सापेंद्र येथील पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळाने श्री विठ्ठल मंदिरात आयोजित केलेल्या नाट्यामहोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने नाईक बोलत होते.व्यासपीठावर उत्पल पर्रीकर, कला आणि संस्कृती संचलनालयाचे उप-संचालक अ शोक परब, भजनी कलाकार सुहास्य सोमनाथबुवा च्यारी, ओल्ड गोव्याच्या सरपंचा सौ. सेंड्रा पियेदाद गोन्साल्विस, साहित्यिक तथा दै. तरुण भारतचे संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक, कुंभारजुवे मतदारसंघातील समाजसेवक समिल वळवईकर, श्री विठ्ठल देवस्थानचे उपाध्यक्ष जयकुमार आमोणकर, खजिनदार नीलेश गांवकर, पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संदीप नाईक, सत्कारमूर्ती नाट्याकर्मी नागेश महाबळेश्वर फडते, गौरवमूर्ती शंभू देवानंद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कला-संस्कृती टिकविण्याची गरज : उत्पल पर्रीकर
आजच्या आधुनिक काळात आपल्या पारंपरिक कला तसेच संस्कृती टिकविण्याची गरज आहे. आपली हिंदू संस्कृती मानवी मूलांचा पुरस्कार करणारी आहे, म्हणून आज जगातील लोक भारतीय संस्कृतीकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.
कला-संस्कृतीतून मिळते चैतन्य : नाईक
कला व संस्कृती आपल्या अंगी बाणविल्यास आपणास आनंद व चैतन्य प्राप्त होते. त्यामुळे आपण उत्साही राहतो. केवळी उत्सवी सोहळे साजरे न करता आजच्या बाल तसेच युवकांनाही कला-संस्कृती कळावी यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविणारी पानवेलकर संस्था उत्कृष्ठ काम करत आहे, असे राजू भिकारो नाईक म्हणाले.
आजच्या काळात अध्यात्माला खूप महत्व : वळवईकर
आजच्या काळात पैशापेक्षा समाधान महत्वाचे आहे. ते मिळविण्यासाठी सर्वांनी आध्यात्म जाणून घेणे गरजेचे. ध्यान, नामस्मरण, योग, प्रार्थना यासारख्या माध्यमातून आपण मनशांती व चैतन्य मिळवू शकतो. आपल्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्माला खूप महत्व आहे, असे समिल वळवईकर म्हणाले. गोव्याच्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी गोवा सरकारचे कला-संस्कृती खाते प्रयत्नशील असून खात्याच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कलाकारांनी तसेच संस्थांनी गोव्याची संस्कृती जपावी आणि पुढच्या पिढीकडे सोपवावी, असे अशोक परब यांनी सांगितले. यावेळी सुहास्य च्यारी, सेंड्रा पियेदाद गोन्साल्विस यांचीही समयोचित भाषणे झाली. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नाट्याक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले नाट्याकर्मी नागेश महाबळेश्वर फडते आणि कलाकार शंभू देवानंद नाईक यांचा गौरव करण्यात आला. दुर्गेश प्रसाद यांनी तयार केलेली श्रीपाद नाईक यांची प्रतिमा श्रीपाद नाईक यांना प्रदान करण्यात आली. पारंपारिक समई प्रज्वलनाने आणि पानवेलकर कला आणि सांस्कृतिक मंडळाच्या महिलांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुऊवात झाली. संदीप नाईक यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन सुदन फडते यांनी तर आभार सुदेश नाईक यांनी मानले.