मंत्री गोविंद गावडे यांना विश्वास : खेळाडूंना सरकारी नोकरीत दोन टक्के जागा राखीवतेचा प्रस्ताव : कला अकादमीचे काम 100 टक्के खात्रीदायक
प्रतिनिधी / पणजी
चालू वर्षी जरी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यास गोवा राज्य मुकले असले तरी पुढील वर्षी या स्पर्धा गोव्यात होतील, असा विश्वास क्रीडा, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेतील मागण्यांवरील चर्चेत बोलताना प्रकट केला. कला अकादमीचे नूतनीकरण होत नाही तर तिची संपूर्ण दुरुस्ती होत असून ते काम 100 टक्के खात्रीचे असल्याचा दावा त्यांनी केला. म्हापसा, पेडणे, सांगे येथील रवींद्र भवनचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार असून जागेअभावी ते काम पूर्ण करता आले नाही, असे त्यांनी नमूद केले. त्यासाठी जागा निश्चित करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
खेळाडूंना सरकारी नोकरीत 2 टक्के जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला असून सर्व क्रीडा संस्था, संघटना, क्लब यांना राष्ट्रीय क्रीडा कोड कार्यवाहित आणण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या सूचनेनुसार कला अकादमीचे बांधकाम स्पेशल एजन्सीकडे देण्यात आले असून जीएसआयडीसीने ते काम करण्यास नकार दर्शवला, अशी माहिती गावडे यांनी दिली. गोवा इंजिनियरींग कॉलेज, आयआयटी मद्रास, जीएसआयडीशी संलग्न एजन्सी अशा तिघांनी कला अकादमीवर अहवाल तयार केले असून कला अकादमीची दुरुस्तीची शिफारस त्यांनी केल्याचे गावडे यांनी सांगितले.
कला अकादमीच्या दुरुस्तीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही घेण्यात व मान्य करण्यात आला असून कायदेशीर सोपस्कार पूर्ण करूनच ते काम हाती घेण्यात आले आहे, असा खुलासा गावडे यांनी विधानसभेत बोलताना केला.
पर्यटकांची फसवणूक थांबवा ः लोबो
गोव्यात पर्यटकांना फसवले जाते त्यावर कायमस्वरुपी उपाय करा आणि त्यांची फसवणूक थांबवा, अशी मागणी मायकल लोबो यांनी केली. पर्यटनाच्या मास्टरप्लॅनवर रु. 5 कोटी खर्च केले. तो प्लॅन कुठे गेला. त्याचे नामोनिशाणही दिसत नाही, असे ते म्हणाले. तो प्लॅन पुढे नेणार की रद्द करणार ते सांगा, अशी विचारणा लोबो यानी केली. पर्यटनावर कोटय़वधी खर्च केले. नावे माहीत नसलेल्या देशातही ‘रोड शो’ करण्यात आले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पर्यटक येतात आणि समुद्रकिनारी मद्य पितात, धिंगाणा घालतात. बाटल्या तेथेच फोडतात. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. याकडे लोबो यांनी लक्ष वेधले. पोलीसही तिकडे लक्ष देत नाहीत, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या सुविधा विनावापर
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी साधनसुविधा उभारल्या. परंतु त्याचा वापरच झाला नाही. त्या सुविधा पांढरा हत्ती ठरल्या असून त्यांचा वापर करावा, अशी मागणी लोबो यांनी केली. पर्यटक पोलिसांची स्थापना करा आणि त्यांना किनारी नेमा असे लोबो यांनी सुचवले. समुद्रकिनारे काळोखात असून तेथे प्रकाश दिवे पेटवा, असे ते म्हणाले.
फुटबॉल प्रशिक्षक 19 महिने वेतनाविना : सरदेसाई
क्रीडा खात्यामध्ये मोठय़ा रकमेची तरतूद करून देखील खर्च करण्यात येत नाही. गुंतवणूकही नसल्याने खेळाडूंना पदके मिळत नाहीत, अशी खंत आमदार विजय सरदेसाई यांनी प्रकट केली. फुटबॉल प्रशिक्षकांना 19 महिने वेतनच देण्यात आलेले नाही, मग ते खेळाडूंना काय शिकवणार आणि पदके मिळणार कशी ? अशी विचारणा त्यांनी केली. फातोर्डाचा स्विमिंग पूल बंद आहे. मागील वर्षी सनबर्न महोत्सवाला परवाना दिला नाही म्हणून मुख्यमंत्री सांगतात, तरी पण तो महोत्सव झालाच. याकडे सरदेसाईंनी लक्ष वेधले. पर्यटन धोरण, मास्टरप्लॅन केला, परंतु. पर्यटनात वाढ झाली नाही असेही त्यांनी निदर्शनास आणले.
पर्यटनाचे ‘रोड शो’ बंद करण्याची मागणी त्यांनी केली. रिव्हर प्रिन्सेस काढण्यासाठी रु. 92 कोटी खर्च करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गोवा परशुराम भूमी म्हणतात, पण तळी, मंदिरे यांची सुधारणा होत नाही. त्यांची सुधारणा करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. गोवा ब्रॉडबॅन्ड योजना म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी करून त्याची चौकशी करण्याची गरज प्रकट केली. गोव्यात आयटी उद्योग आणावेत. मडगाव कदंब बसस्थानकासमोरील जागेत आयटी उद्योग सुरू करा, असेही त्यांनी सुचवले. आमदार जीत आरोलकर यांनीही चर्चेत भाग घेऊन आपले म्हणणे मांडले.
पदकप्राप्त क्रीडापटूंना आर्थिक लाभ मिळावा : कामत
गोव्यात 2011 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती होती. पण ती नंतर पुढे गेली. मागील क्रीडामंत्री फक्त बढाया मारत राहिले आणि क्रीडा साधनसुविधा तयार झाल्या नाहीत, असे आमदार दिगंबर कामत यांनी निदर्शनास आणले. पदके मिळालेल्या क्रीडापटूंना त्वरित आर्थिक लाभ देण्याची गरज आहे. तो दोन चार वर्षांनी नंतर देण्यात अर्थ नाही. रोड शो बंद करा आणि त्यावरील निधी पर्यटन साधनसुविधांसाठी खर्च करा, म्हणजे पर्यटकांना दिलासा मिळेल, असे कामत म्हणाले. शिमगोत्सव, कार्निव्हलचे पैसे अनेक कलाकारांना मिळाले नाहीत. ते देण्याची मागणी कामत यांनी केली. सांस्कृतिक धोरणाप्रमाणे शाळकरी मुलांना गुण देण्याची योजना अद्याप तशीच आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि ती कार्यरत करण्यास सुचवले. म्हापशात रवींद्र भवनाची गरज असून ते करावे, अशी मागणी त्यांनी केली.
गोवा एस्कॉर्ट सर्व्हिसमुळे राज्य बदनाम होत असून मसाज पार्लर देखील गोव्याची बदनामी करीत असल्याने ते सर्व बंद करा, अशी मागणी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली. गोव्याचे नाव बदनाम होण्यापासून वाचले पाहिजे तरच पर्यटक वाढतील, असेही ते म्हणाले.