वृत्तसंस्था/ सुरत
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सांघिक टेबल टेनिसमध्ये पुरुष विभागात गुजरातने तर महिला विभागात पश्चिम बंगालने सुवर्णपदक पटकावले. दिल्ली व महाराष्ट्र यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
येथे झालेल्या अंतिम लढतीत ऑलिम्पिकपटू मौमा दास व सुतीर्था मुखर्जी यांनी पश्चिम बंगालला महिलांचे जेतेपद मिळवून दिले तर पुरुषांमध्ये हरमीत देसाई व मानव ठक्कर यांनी गुजरातला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
प.बंगालच्या महिलांनी अंतिम लढतीत महाराष्ट्रावर 3-1 अशा फरकाने मात केली. ऐहिका मुखर्जीने स्वस्तिका घोषचा 3-0 असा पराभव केल्यानंतर रीथरिश्या टेन्निसनने राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या सुतीर्था मुखर्जीवर 3-0 अशी मात करून महाराष्ट्राला बरोबरी साधून दिली. तिसऱया सामन्यात दिया चितळेविरुद्ध अनुभवी मौमा दासला संघर्ष करावा लागला. पहिला गेम गमविल्यानंतर तिने चितळेवर 3-2 (6-11, 16-14, 10-12, 14-12, 11-6) अशी मात करीत एकतर्फी जेतेपद निश्चित केले.
पुरुष विभागात अग्रमानांकित गुजरात संघाने अंतिम लढतीत दिल्लीचा 3-0 असा पराभव केला. मानव ठक्करने दिल्लीच्या सुधांशू ग्रोव्हरचा, कर्णधार हरमीत देसाईने पायस जैनचा, मनुष शहाने यशांश मलिकचा पराभव करीत जेतेपद पटकावले. महाराष्ट्र व प.बंगाल यांनी पुरुष विभागात कांस्य पटकावले तर महिलांमध्ये तामिळनाडू व तेलंगणा यांनी कांस्य जिंकले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रत्यक्षात 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. पण चीनमध्ये विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशिप 30 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने राष्ट्रीय स्पर्धेतील टेबल टेनिस हा क्रीडाप्रकार त्याआधीच घेण्यात येत आहे. सांघिक स्पर्धा झाल्यानंतर एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरीच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सर्वप्रथम 1924 मध्ये सध्या पाकमध्ये असलेल्या लाहोरमध्ये घेण्यात आली होती. 2015 मध्ये याआधी शेवटची स्पर्धा झाली होती. सात वर्षांच्या खंडानंतर सध्या ती गुजरातमध्ये घेण्यात येत आहे.