-अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचा नागरी सत्कार
-संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात मान्यवर आणि विविध समाजबांधवांच्या उपस्थितीत रंगला सोहळा ; मुळीक यांना चारचाकी वाहन प्रदान
प्रतिनिधी, कोल्हापूर
Kolhapur News : 21 व्या शतकात जाती -पातींना कवटाळत बसलो तर देशाची, महाराष्ट्राची वाटचाल प्रतिगामी दिशेने होईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार कृतीत येण्यासाठी पुरोगामी विचाराने वाटचाल व्हायला हवी, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचा भव्य नागरी सत्कार आणि चारचाकी वाहन प्रदान सोहळय़ात श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ, राजर्षी शाहू सलोखा मंच, वसंतराव मुळीक नागरी सत्कार समिती आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहात शनिवारी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचा भव्य नागरी सत्कार आणि चारचाकी वाहन प्रदान सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती होते. आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार जय़श्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, माजी आमदार उल्हास पवार, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक ‘रोडमराठाकार’ डॉ. वसंतराव मोरे, शाहू अभ्यासक डॉ. जे. के. पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वसंतराव मुळीक आणि त्यांच्या पत्नी सौ. मेघा मुळीक यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा- ऊस परिषदेत राजू शेट्टींचा सरकारला इशारा, मावस भाऊ आणि मिळून खाऊ हे चालू देणार नाही
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, देशाची पुन्हा एकदा विभागणी होत असल्याचे चित्र आहे. जातीपातींना कवटाळत बसलो तर देशाची, महाराष्ट्राची अधोगती होईल. यासाठी राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचाराने सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. जाती-भेदाच्या भिंती मोडल्या जात नाहीत तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. कृतीतून या भिंती तोडल्या पाहिजेत.
राजर्षींच्या विचारानेच वसंतराव मुळीक यांचे कार्य
वसंतराव मुळीक यांच्या गेल्या पस्तीस चाळीस वर्षांतील कार्याचे कौतुक करताना श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी विचाराचा वारसा जपत कृतीशील कार्य करण्याचे काम मुळीक आणि त्यांचे सहकारी करत आहेत. सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन पुरोगामी विचार बहुजन समाजात रूजविण्याचे कार्यही मुळीक करत आहे, ही गोष्टी कौतुकास्पद आहे.
हेही वाचा- राजकारणात गोंधळ,बळीराजाचं या देशाचा खरा राजा होईल;पट्टणकोडोली यात्रेत फरांडेबाबांची भाकणूक
आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याकडून गौरवोद्गार
आमदार मुश्रीफ म्हणाले, वसंतराव मुळीक यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. मराठा भवन साकारण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरवू. तसेच मराठा आरक्षणासाठी सहकार्य करु. आमदार सतेज पाटील म्हणाले, वसंतराव मुळीक हे निस्पृह व्यक्तिमत्व आहे. सर्व जातीधर्मातील लोकांना जोडण्याचे काम करत आहेत. आता मराठा भवनचे शिवधनुष्य त्यांनी हाती घ्यावे. लवकरच भूमिपूजन आणि दोन वर्षात भवन पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावेत.
मराठा भवन उभारणीवरून मुळीक यांनी केली खंत व्यक्त
वसंतराव मुळीक म्हणाले, गेल्या काही वर्षात समाजात काम करत असताना समाजाने भरभरुन प्रेम दिले आहे. या प्रेमाची पोहोचपावती आजच्या कार्यक्रमातून दिसून येते. तर या सत्काराच्या निमित्ताने जबाबदारीत वाढ झाली आहे. मराठा भवनचा प्रश्न मार्गी लागला नसल्याबद्दल खंत व्यक्त करत आय.टी.पार्क जवळील पाच एकर जागेत मराठा भवन होण्यासाठी शेवटचा प्रयत्न व्हावा. मराठा समाज 50 टक्के आहे, पण आतापर्यंत केवळ 33 लाख रुपये निधी जमा झाला आहे. हे भवन झाले नाही तर 33 लाख परत द्यावे लागतील किंवा आपल्याला झोळी घेऊन फिरावे लागेल असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी केले. आभार आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी मानले. सूत्रसंचालन पंडीत कंदले यांनी केले. कार्यक्रमाला उद्योगपती व्ही.बी.पाटील, ऍड गुलाबराव घोरपडे, राष्ट्रवादींचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, केएसएचे सरचिटणीस माणिक मंडलिक, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, माजी नगरसेवक अनिल कदम, डॉ. तौफिक मुल्लाणी, पानिपत विचार मंचचे मिलिंद पाटील, लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे सुभाष जाधव, जयशिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजीराव माने, डॉ. संजय पाटील, डॉ.संदीप पाटील, अवधूत पाटील, महादेव पाटील, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, दीपा डोणे, विद्या साळोखे, मंगल कुऱहाडे, नीता लाड, नीलम मोरे, रंजना जाधव, संजिवनी चौगले, उषा लांडे, उज्ज्वला जाधव, सुनीता पाटील, शांताबाई पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचा विषय मागे पडला आहे, पंतप्रधानांना भेटावे लागेल-
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लाखो लोकांचे मोर्चे निघाले. पण हा विषय सद्या मागे पडला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यासंदर्भात भेट मागितली. पण भेट मिळाली नाही. पंतप्रधानच हा प्रश्न सोडवू शकतात. यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधानांकडे हा विषय मांडावा असे श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले.
मुळीक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव-
गौरव समारंभासाठी मुळीक यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते, हितचिंतक आले होते. सत्कार समारंभाची सांगता झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.