दीड कोटी लोकांना मिळणार मोफत उपचार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाकाळात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करविण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोटय़वधी रुग्णांना मोदी सरकार अत्यंत मोठी खूशखबर देणार आहे. मागील दोन वर्षांपासून शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असलेल्या दीड कोटी लोकांवर सरकारच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करविण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून देशाच्या प्रत्येक भागातील लोकांना ही सुविधा प्रदान करणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील सर्व मोठय़ा सरकारी रुग्णालयांना आणि खासगी रुग्णालयांना तयार राहण्यास सांगितले आहे.
कोरोना संकटामुळे मोतीबिंदूच्या जवळपास दीड कोटी रुग्णांना अद्याप शस्त्रक्रिया करवून घेता आलेली नाही. याचमुळे पुढील 2-3 वर्षांमध्ये सुमारे 3 कोटी लोकांच्या नेत्रांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने म्हटले आहे.
देशाच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दरवर्षी मोतीबिंदूच्या 50-60 लाख शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यावर शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाले होते. याचाच परिणाम म्हणून देशात सुमारे दीड कोटी लोकांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता आलेली नाही. हे लोक मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोना संकट ओसरल्याने आणि देशातील लसीकरण मोहीम यशस्वी ठरल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पुढाकारावर ही मोहीम सुरू केली जाणार आहे.
तयारी सुरू
केंद्रीय आरोग्य मंत्रालय मागील काही दिवसांपासून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत मिळून विशेष मोहिमेची रुपरेषा तयार करत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱयानुसार याकरता सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. याच्या अंतर्गत केंद्र सरकार राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना मदत करणार आहे.
आयुष्मान असेल तर…
आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थीवर खासगी रुग्णालयांमध्ये देखील मोफत शस्त्रक्रिया करविण्यात येणार आहे. पुढील 2-3 वर्षांमध्ये 2.50 कोटी लोकांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया वेळेत करण्यात न आल्यास दृष्टी गमवावी लागू शकते.