रशियाच्या विदेश मंत्र्यांचा आरोप
वृत्तसंस्था /मॉस्को
भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण संबंधांसाठी सीमा नव्हे तर नाटो जबाबदार असल्याचा दावा रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केला आहे. चीन आणि भारत यांच्यात अतिरिक्त तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न नाटो करत असल्याचे स्पष्ट आहे. नाटो केवळ युरोपीय देशांपुरती मर्यादित नाही. आशिया-प्रशांत क्षेत्रासंबंधी नाटोच्या माद्रिद परिषदेत सैन्य आघाडीची घोषणा करण्यात आली होती. यातून नाटोकडून भारत आणि चीन यांच्या संबंधात तणाव निर्माण केला जात असल्याचे स्पष्ट होते. नाटोचा युद्धघोष युरो-अटलांटिक आणि हिंद-प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षेशी निगडित असल्याचा दावा लावरोव्ह यांनी केला आहे.
नाटो देश आता स्वतःचा मिलिट्री ब्लॉक तयार करू पाहत आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण ऑकस आहे. आशियात एक वेगळीच आघाडी असुन यात अमेरिका आणि ब्रिटनसह ऑस्ट्रेलियाही सामील आहे. जपानवरही ऑकसमध्ये सामील होण्याचा दबाव आहे. जपानचे देखील सैन्यीकरण केले जात आहे. जपान याच कारणामुळे आता स्वतःच्या घटनेत बदल करत असल्याचा दावा रशियाच्या विदेशमंत्र्यांनी केला आहे.