शहर प्रतिनिधी/ पाटण
राज्यात उत्तम पर्जन्यवृष्टी आणि निसर्गवृद्धीकरिता पाटण तालुक्यातील मणदुरेच्या काऊदऱयावर जानाई-मल्हारच्या साक्षीने निवकणे जानाई देवीच्या यात्रेसाठी खंडोबाच्या जेजुरीवरून पायी चालत आलेल्या हजारो भाविक भक्तांनी झाडफळांच्या बियांसह गुलाल-भंडाऱयाची उधळण करीत सोमवारी सकाळी निसर्गपूजा उत्साहात साजरी केली.
शेकडो वर्षांची परंपरा असलेली जयाद्री ते सह्याद्री ही जेजुरी ते निवकणे (ता. पाटण) जानाईदेवी पायी पदयात्रा यंदाही उत्साहात पार पडली. या सोहळ्यात समुद्र सपाटीपासून 1300 मीटर उंच अशा सह्याद्री डोंगरमाथ्यावरील मणदुरे काऊदरा येथे शेकडो जानाईभक्तांनी आणि निसर्गप्रेमींनी राज्यात उत्तम पर्जन्यवृष्टी आणि निसर्गवृद्धीसाठी नारळ फोडून भंडारा व झाडफळ बियांची उधळण केली.
या उत्सवाचा प्रारंभ जेजुरीतून होतो. यावेळी संपूर्ण जेजुरी गाव आपल्या जानाईदेवी निसर्गयात्रेच्या प्रस्थान सोहळ्याला निरोप देण्यास एकत्र येत असतो. बैलगाडय़ांचा ताफा असा लवाजमा असतो. या संपूर्ण सोहळ्यात जानाईदेवी अन्नदान ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नदान केले जाते. यंदाचे त्यांचे 25 वे वर्ष असून संपूर्ण पदयात्रेत ट्रस्टमार्फत चोख व्यवस्थापन केले जाते. जेजुरी मार्तंड देवसंस्थान आणि जेजुरी मेडिकल असोसिएशन यांच्यामार्फत विशेष सहकार्य केले जाते.
संत नागू माळी यांनी या पायी पदयात्रेची सुरवात शेकडो वर्षांपूर्वीपासून सुरू केली असून आजही त्यांचे वंशज नागेश झगडे व परिवार ही परंपरा टिकवून आहेत. नुकत्याच दहा वर्षांत सुरू झालेल्या निसर्गपूजा उत्सवातून आध्यत्मिक आणि निसर्गाचे दर्शनही घडते. यात उंच डोंगराहून भंडारा व फळेवृक्षांच्या बियांची उधळण करून प्रार्थनाही केली जाते. येथील महिलांना देवी मानून वृक्ष व वस्त्रदान केले जाते. यावेळी निसर्ग गाणी गात महिलाही सहभागी होतात. या निसर्ग पूजेकरिता पाटण पत्रकार संघ व जेजुरी पत्रकार संघ विशेष परिश्रम घेत असतात. जानाईदेवी अन्नदान सेवा ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र बारभाई, अध्यक्ष शिवाजी कुतवळ यांच्यासह ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ते, भक्तगण यांनी विशेष परिश्रम घेतले. निश्चितच राज्यातील विविध उत्सवातून धार्मिक आणि निसर्ग संस्कृतीचे जतन करणाऱया अशा निसर्ग पूजा सर्वत्र साजऱया झाल्यास संपूर्ण जग वृक्षवल्लीने हरित होईल यात शंका नाही, असे मत निसर्गप्रेमी विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी व्यक्त केले.