एक महिन्यासाठी मुंबईत स्थानबद्धतेत राहणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेशी संबंधित आरोपी गौतम नवलाखा यांना कारागृहातून मुक्त करुन स्थानबद्धतेत ठेवावे ही त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण ही मागणी करीत आहोत, असे नवलाखा यांनी स्पष्ट केले.
नवलाखा यांच्या वैद्यकीय अहवालावर प्रथम दर्शनी संशय घेण्याचे कारण नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. स्थानबद्धतेतही नवलाखा यांच्यावर अनेक निर्बंध आणि अटी घातल्या जातील असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यांना एक महिन्यासाठी मुंबईत स्थानबद्धतेत ठेवावे. या आदेशाचे क्रियान्वयन 48 तासांमध्ये करावे. या प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा अंत केव्हा होणार याचेही अनुमान काढता येत नाही. अशा स्थितीत त्यांना कारागृहात ठेवल्याने काहीही हेतू साध्य होणार नाही. एक महिन्यासाठी त्यांना स्थानबद्धतेत ठेवावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आदेश त्वरित लागू होणार आहे.
अनेक निर्बंध
नवलाखा यांनी त्यांच्या सुरक्षेच्या खर्चासाठी 2.40 लाख रुपये ठेव म्हणून ठेवावेत. तसेच स्थानबद्धतेत त्यांना संगणकाचा उपयोग करता येणार नाही. तसेच इंटरनेट किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संपर्क साधनाचा उपयोग त्याला करता येणार नाही. बिगर इंटरनेट मोबाईलचा उपयोग त्यांना दिवसातून एकदाच 10 मिनिटांसाठी करता येईल. हा मोबाईल त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱयाकडून मिळेल. मोबाईलवर त्यांनी पोलीस कर्मचाऱयाच्या उपस्थितीतच बोलले पाहिजे. नवलाखा यांनी मुंबई सोडता कामा नये. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव किंवा कोणत्याही प्रकारे प्रभाव येईल असे कृत्य करता कामा नये. त्यांच्यासाठी वृत्तपत्रे आणि टीव्ही उपलब्ध असेल. मात्र इंटरनेटचे माध्यम उपलब्ध असणार नाही, असे न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशपत्रात स्पष्ट केले आहे.