ऑनलाईन टीम / मुंबई :
राजद्रोहाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याने मुंबईतील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या याचिकेवर 29 एप्रिल पर्यंत उत्तर देण्याचे सरकारला निर्देश दिले आहेत. त्यानंतर राणा दाम्पत्याच्या जामिनावर सुनावणीची तारीख देण्यात येणार आहे.
14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याची जामिनासाठी धावाधाव सुरु होती. आज न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना राणा दाम्पत्याचे वकील ॲड रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली. त्यावेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या जामीनाला विरोध केला. आगोदर वांद्रे न्यायालयातील जामीन अर्ज मागे घ्यावा लागेल तरच सत्र न्यायालयात सुनावणी होईल, असे त्यांनी सांगितले. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी आम्ही वांद्रे न्यायालयातील अर्ज मागे घेत आहेत, असे स्पष्ट केले. तरीही न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला नाही. राणांच्या जामीन याचिकेवर सरकारला उत्तर देण्यासाठी सत्र न्यायालयाने 3 दिवसांचा अवधी दिला आहे. 27 एप्रिल रोजी जामिनावर लेखी युक्तिवाद होईल आणि 29 एप्रिल रोजी प्रत्यक्ष युक्तिवाद होणार आहे. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. नवनीत राणा यांना भायखळय़ाच्या महिला कारागृहात, तर रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.