नौदल दिनापूर्वी नौदलप्रमुख आर. हरी कुमार यांचा विश्वास ः आयएनएस विक्रांतचे केले कौतुक
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आयएनएस विक्रांत नौदलात कार्यान्वित होणे ही देश आणि नौदलासाठी एक ऐतिहासिक घटना असून ती खऱया अर्थाने आत्मनिर्भरतेची मशाल आहे, असे प्रतिपादन नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी शनिवारी केले. तसेच 2047 पर्यंत म्हणजेच येत्या 25 वर्षांत भारतीय नौदल पूर्णपणे आत्मनिर्भर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नेव्ही-डेच्या (नौदल दिवस) एक दिवस आधी, शनिवारी राजधानी दिल्लीत भारतीय नौदलाच्या वार्षिक पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित केले.
जगात विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेले फार कमी देश आहेत. भारताने या कामगिरीत आपली ताकद दाखवून दिली आहे. आयएनएस विक्रांतची निर्मिती हे शक्तिमान भारताचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. आयएनएस विक्रांत आपल्या स्वदेशी क्षमतेचे एक चमकते प्रतीक असून देशवासियांचा आत्मविश्वास वाढवते. ‘विक्रांत’ने जगात देशाचा दर्जा उंचावण्यास हातभार लावला आहे. अशा भव्य-दिव्य कामगिरीतून येत्या काही वर्षांत इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या विस्तृत भागात तिरंगा अभिमानाने फडकेल, असे नौदलप्रमुख पुढे म्हणाले. आम्ही आमच्या सुरक्षेच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहू शकत नाही. सरकारने आम्हाला आत्मनिर्भर भारत आणि सर्वोच्च नेतृत्व याबाबत अतिशय स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली असून 2047 पर्यंत नौदल आपले उद्दिष्ट गाठेल, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
प्रथमच 341 महिला नौदलात दाखल
आम्ही पहिल्यांदाच नौदलात महिलांचा समावेश केला आहे. अग्निवीर योजनेंतर्गत नौदलात 341 महिलांची भरती करण्यात आली आहे. आता महिला अधिकाऱयांनाही पुढील वर्षापासून नौदलात सामावून घेतले जाणार आहे. आतापर्यंत एकूण 3000 अग्निवीर नौदलात सामील झाले आहेत. अशाप्रकारे अग्निवीरांची पहिली तुकडी तयार करण्यात आल्याचे ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी शनिवारी सांगितले. आता नौदलाच्या सर्व शाखा सर्वांसाठी खुल्या होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही 2023 पर्यंत सर्व शाखांमध्ये महिला अधिकाऱयांचा समावेश करण्याचा विचार करत आहोत, असे ते पुढे म्हणाले.
चीनच्या कुरापतींवर नौदलाची नजर
हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या कुरापतींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. गेल्या वर्षभरात भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावामुळे सागरी सुरक्षेला महत्त्व आले आहे. चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत 3 अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून 30 एमक्यू-9बी प्रीडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. या ड्रोनद्वारेच हेलफायर क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले होते. या ड्रोनच्या माध्यमातून अल-कायदाचा दहशतवादी अल-जवाहिरी मारला गेला असल्याचा दाखला नौदल प्रमुखांनी दिला.