ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांना अटक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर दाखल झालेल्या NC आता FIR मध्ये रूपांतरीत करण्यात आल्या आहेत. व त्या Cognisable Offence मध्ये घेतल्या आहेत. आज रात्री त्यांना मुख्यालयाचे पोलीस अटक करणार अशी खात्रीलायक बातमी मला पोलिसांनीच दिली आहे. आपल्या राज्याची वाटचाल आता पोलीसी राज्याकडे होऊ लागली कि काय? तर अटक कराच”, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे. आव्हाड यांनी काल रात्री हे ट्विट केलं आहे.
काय म्हणाले होते परांजपे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याला तुम्ही चाणक्य समजत आहात, तोच तुमचा टायटॅनिक करायला कारणीभूत ठरणार आहे. तर ही आमची वैचारिक लढाई आहे. आमच्यावर ज्यांनी गुन्हे दाखल केले आहेत तेच खरे गुन्हेगार आहेत. आंदोलन करताना आम्ही काही घोषणा दिल्या. त्या असंसदीय नव्हत्या. आम्ही कोणाचीही बदनामी केली नाही.