राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरेंची टीका; निवडणूक पूर्वीच्या घोषणांचा जाहीर झालेला अर्थसंकल्प
रत्नागिरी प्रतिनिधी
राज्याच्या जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारने निशाणा साधला. मुदतपूर्व निवडणुका लागल्या तर हा शिंदे-फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल या भीतीने निवडणूक पूर्वीचा घोषणांचा अर्थसंकल्प असल्याचे तटकरे यांनी सांगितले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या जातील, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रश्न उपस्थित केले. अर्थसंकल्पापेक्षा पुरवणी मागणी जास्त आहेत. मग यांनी अर्थसंकल्प कसला तयार केला? असा प्रश्न तटकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा किती आहे?, राज्यावर साडेसहा हजार कोटींचे कर्ज असताना सरकारकडे निधी किती आहे? हा अर्थसंकल्प कितीचा याचा ताळमेळ बसतो का? याचे उत्तर अर्थमंत्र्यांनी जनतेला द्यायला हवे, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी भक्कम आहे. येत्या 15 मार्चला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षाची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत यापुढील सर्व निवडणुका एकत्रित लढण्याच्या सूचना प्रत्येक पक्षांचे नेते करतील. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या जातील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेना शिंदे गटाच्या स्वयंघोषित प्रवक्त्यांकडून पोपटपंची सुरू
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शिवसेना फोडली, असा असा आरोप शिंदे गटाचे स्वयंम घोषित प्रवक्त्यांनी केला आहे. मात्र त्या स्वयंघोषित प्रवक्त्यांनी स्वत:ला आरशात पहावे. आपल्याला आमदारकी कोणी दिली, याचे आत्मपरीक्षण करावे. आपले राजकीय अज्ञान किती आहे, हे राज्यातील जनतेला ते दाखवत असावेत. सध्या ते राजकीय विश्लेषक झाले आहेत. त्यातूनच त्यांची पोपटपंची सुरु असल्याचा टोला खासदार तटकरे यांनी शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर लगावला. राजकारणात कोणी कोणावर बोलावे, याला तारतम्य लागते. ते शिंदे गटाच्या प्रवत्यांकडे राहिलेले नाही. यातूनच त्याचा राजकीय अज्ञानपणा पाहण्याची संधी राज्यातील जनतेला मिळत आहे. त्याच्या टीकेचा महाविकास आघाडीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे तटकरे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचा कोकणातही होणार मेळावाः खासदार तटकरे
महाविकास अघाडीचे राज्यभर मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोकणातही मेळावा घ्यावा, अशी सूचना आपण राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे. त्यामुळे कोकणातील कोणत्याही एका जिल्ह्यात ही सभा होईल. पदावीधर, शिक्षक मतदार संघ, नुकत्याच झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली आहे. तर भाजपने शिंदे गटाला एकही जागा न देवून त्यांना ही त्यांची जागा दाखवून दिल्याचा टोला खासदार सुनील तटकरे यांनी लगावला.