ऑनलाईन टीम / तरुण भारत :
साडेतीनशे वर्ष झाली तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचा अवमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळे शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तत्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मविआच्या महामार्चादरम्यान केली. तसेच महापुरुषांबद्दल गलिच्छ भाषा वापरणाऱ्यांना लोकशाही मार्गातून धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही पवारांनी यावेळी दिला.
महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल कोश्यारी आणि भाजप नेत्यांविरोधात आज मुंबईत मविआने महामोर्चा काढला. या मोर्चाला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, आपण आज महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत. ज्यांच्या हातात सत्तेची चावी आहे ते महाराष्ट्राचा महापुरुषांबाबत चुकीची भाषा वापरत आहेत. शिवाजी महाराज यांचं नावं आज साडेतीनशे वर्ष झाले तरी अखंड आहे. त्यांच्या नावाचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. जर माफी मागितली गेली नाही तर हा तरुण पेटून उठेल.
महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील ही आमचं आदर्श स्थानं आहे. पण त्यांच्याबद्दल बोलणारा बेजबाबदार माणूस पाहिला नाही. मी स्वत: विधानसभेच्या विधानमंडळात 55 वर्ष पाहिली. अनेक राज्यपाल पाहिले. पण यावेळी असा माणूस राज्यपाल म्हणून आला आहे, तो सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यावर वादग्रस्त विधान करत आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. अशा माणसाला राज्यपालपदी राहण्याची आवश्यकता नाही.