यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून 429 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मतदारसंघांपैकी 310 मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय सुनिश्चित झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पेले आहे. ते मंगळवारी ओडीशातील संबलपूर भागात भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेमध्ये भाषण करीत होते. संभलपूर येथे त्यांनी दोन प्रचार सभांमध्ये भाषणे केली. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उमेदवारी दिली आहे. अद्याप 114 मतदारसंघांमध्ये मतदान व्हायचे असून आम्ही निश्चितपणे 400 जागांचे ध्येय गाठणार आहोत, असा विश्वास त्यांनी प्रचारसभांमध्ये व्यक्त केला आहे.
राज्य सरकारवर टीका
ओडीशा सध्या केवळ काही सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेला आहे. येथील राज्य सरकार निष्क्रिय असून भ्रष्टाचारात लिप्त आहे. या राज्य सरकारचे जनतेच्या हितांकडे लक्ष नाही. त्यामुळे राज्य सरकारसंबंधी प्रचंड नाराजी जनतेच्या मनात आहे. ही नाराजी मतयंत्रांमधून निश्चितपणे व्यक्त होईल. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला ओडीशात मोठे यश मिळेल, असे प्रतिपादनही अमित शहा यांनी या सभांमधून केले.