374 धावांना प्रत्युत्तर देताना मध्यप्रदेश 3 बाद 368, डावाअखेर आघाडीसाठी 7 धावांची आवश्यकता
बेंगळूर / वृत्तसंस्था
नवोदित यश दुबे (133) व शुभम शर्मा (116) यांनी धमाकेदार शतके झळकावल्यानंतर मध्यप्रदेशचा संघ हेवीवेट मुंबईविरुद्ध रणजी चषक जेतेपद संपादन करण्याच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. मुंबईच्या पहिल्या डावातील सर्वबाद 374 धावांना प्रत्युत्तर देताना मध्यप्रदेशने शुक्रवारी सामन्याच्या तिसऱया दिवसअखेर 3 बाद 368 धावांपर्यंत मजल मारली. दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी रजत पाटीदार 106 चेंडूत 13 चौकारांसह 67 तर कर्णधार आदित्य श्रीवास्तव 33 चेंडूत एका चौकारांसह 11 धावांवर खेळत होते.
रणजी स्पर्धेच्या या निर्णायक अंतिम लढतीत मुंबईने पहिल्या डावात 374 धावांची मजल गाठली, त्यावेळी ही धावसंख्या पुरेशी ठरु शकेल, असे प्रथमदर्शनी संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात मध्यप्रदेशने दुबे व शुभमच्या धमाकेदार शतकामुळे सहजपणे या धावसंख्येच्या उंबरठय़ापर्यंत जोरदार मजल मारली. दुबेने 336 चेंडूत 14 चौकारांसह 133 तर शुभम शर्माने 215 चेंडूत 15 चौकार, एका षटकारासह 116 धावांचे योगदान दिले.
यापूर्वी मध्यप्रदेशने 1998-99 मध्ये रणजी स्पर्धेत शेवटची फायनल खेळली, त्यावेळी त्यांना कर्नाटकविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. चंद्रकांत पंडित या मुंबईकर प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालील मध्यप्रदेशने शुक्रवारी दिवसभरात केवळ 245 धावा फलकावर लावल्या. पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मुंबईचा सॉलिड गेमप्लॅन पूर्णपणे उद्ध्वस्त करुन टाकला.
आयपीएलमध्ये आरसीबी कॅम्पेनचा हिरो ठरलेल्या रजत पाटीदारने नंतर 13 चौकारांसह नाबाद 67 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. आता मध्यप्रदेशचा संघ या लढतीत आपला पहिला डाव शक्य तितका लांबवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरुन मुंबईला कमबॅक करण्याची फारशी संधी राहणार नाही.
चिन्नास्वामी स्टेडियमवरील लढतीत खेळपट्टीला अद्याप काहीच तडे गेलेले नाहीत. त्यात स्वच्छ सूर्यप्रकाशाने मध्यप्रदेशच्या फलंदाजांना स्थिरस्थावर होऊन उत्तम फटकेबाजी करण्याची आणखी नामी संधी दिली. मुंबईतर्फे डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने (40 षटकात 1-117) सर्वाधिक निराशा केली. अनुभवी धवल कुलकर्णी (21-3-51-0) व तुषार देशपांडे (24-8-73-1) यांनीही मध्यप्रदेशच्या फलंदाजांना सहज फटकेबाजीचे जणू निमंत्रणच दिले.
दिवसभरातील पहिल्या सत्रात स्वैर मारा करत वर्चस्वाची संधी गमावल्यानंतर मुंबईचे गोलंदाज पूर्ण दिवसभर निष्प्रभ ठरत राहिले. दुबे व शर्मा यांनी सातत्याने एकापेक्षा एक सरस कव्हर ड्राईव्ह लगावत आगेकूच केली. सध्याच्या मुंबई रणजी संघात जेतेपदाचा अनुभव असलेला एकमेव धवल कुलकर्णीला आहे. मात्र, त्याचीही स्वैर गोलंदाजी धक्कादायक होती.
शुभम शर्मा दुसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी 269 धावांपर्यंत तर यश दुबे तिसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला त्यावेळी मध्यप्रदेशने 341 धावांपर्यंत मजल मारली होती. शुभमला अवस्थीच्या गोलंदाजीवर तमोरेने झेलबाद केले. दुबेने आपल्या खेळीत 14 चौकार तर शुभमने 15 चौकार व 1 षटकार नोंदवले. या हंगामात मध्यप्रदेशतर्फे दुबेने 613 तर शुभमने 578 धावा केल्या असून हाच धडाका त्यांनी या निर्णायक लढतीत कायम ठेवला. अरमान जाफरने शॉर्ट पॉईंटवर शर्माचा सोपा झेल सोडला. पण, इतका अपवाद वगळता मुंबईला दिवसभरात फारशी संधी मिळाली नाही.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव ः सर्वबाद 374
मध्यप्रदेश पहिला डाव ः 123 षटकात 3 बाद 368 (यश दुबे 336 चेंडूत 14 चौकारांसह 133, शुभम शर्मा 215 चेंडूत 15 चौकार, 1 षटकारासह 116, रजत पाटीदार 106 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 67, आदित्य श्रीवास्तव 33 चेंडूत नाबाद 11. अवांतर 10. तुषार देशपांडे, शम्स मुलानी, मोहित अवस्थी प्रत्येकी 1 बळी).
बॉक्स
आता मुंबईचा भरवसा फक्त चमत्कारावरच!
सामना अनिर्णीत राहिल्यास पहिल्या डावाअखेर मिळवलेली आघाडी निर्णायक ठरणार असल्याने मध्यप्रदेशला विजयाची अधिक संधी असेल, असे सध्याचे चित्र आहे. साहजिकच, आता चौथ्या डावात फलंदाजीला उतरावे लागल्यास त्यात मोठी पडझड झाली नाही तर मध्यप्रदेश जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणार आहे.
वास्तविक, 42 व्या रणजी जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी मुंबईचा संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, मध्यप्रदेशने सर्व बाजी उलटवण्याचा भक्कम प्लॅन अमलात आणला असून उर्वरित दोन दिवसात चमत्कार घडला तरच मुंबईला या सामन्यात कमबॅकची अपेक्षा करता येईल, असे चित्र आहे.