संघाच्या विजयादशमी सोहळय़ात महिला मुख्य अतिथी : महिला सशक्तीकरण अन् शिक्षणावर मांडले विचार
वृत्तसंस्था / नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बुधवारी नागपूरमध्ये विजयादशमी साजरी केली असून मुख्य अतिथी म्हणून महिला सामील झाली आहे. संतोष यादव यांना हा मान मिळाला असून त्या दोनवेळा एव्हरेस्ट सर करणाऱया जगातील एकमात्र महिला आहेत. तर विजयादशमीनिमित्त संघ स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर महिला सशक्तीकरण, शिक्षण धोरण यासारख्या मुद्दय़ांवर संघाचे विचार मांडले आहेत. लोकसंख्या नियंत्रण आणि धर्मआधारित लोकसंख्या असंतुलनाला दीर्घकाळापर्यंत दुर्लक्षित करता येणार नसल्याचे भागवत म्हणाले.
जी सर्व कामे पुरुष करतात, ती कामे महिला देखील करू शकतात. परंतु जी कामे महिला करू शकतात ती सर्व कामे पुरुष करू शकत नाहीत. महिलांना समान अधिकार, काम करण्याचे स्वातंत्र्य आणि निर्णयांमध्ये भागीदारी देणे आवश्यक आहे. आम्ही हा बदल आमच्या परिवारातूनच सुरू करत आहोत. आम्ही अमाच्या संघटनेद्वारे हा बदल समाजापर्यंत पोहोचवू. महिलांची समान भागीदारी निश्चित होत नाही तोवर देशाला विकासाचा वेग गाठता येणार नसल्याचे भागवत म्हणाले.
संघात महिलांची भूमिका
समाज हा महिला आणि पुरुष दोघांनी तयार होतो. कोण अधिक चांगले यावर आम्ही चर्चा करत नाही आहोत. कारण या दोघांपैकी एकाचेही अस्तित्व नसल्यास कुठलाही समाज अस्तित्वात येऊ शकत नसल्याचे आम्ही जाणतो. राष्ट्रनिर्मितीचे काम वेगवेगळय़ा संस्था महिला आणि पुरुषांसाठी करू शकतात. परंतु संघाकडून करण्यात आलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यात महिला आणि पुरुष मिळूनच काम करतात असे भागवत यांनी म्हटले आहे.
समाज अन् मातृशक्ती
कुठल्याही समाजाला सुरळीत वाटचाल करायची असल्यास महिला आणि तिच्या मातृशक्तीकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना आई म्हणतो, आम्ही त्यांना जगतजननी मानतो. असे असूनही आम्ही त्यांच्या कृतींना मर्यादित का करतो हेच समजत नाही. महिलांना आम्ही जगताची निर्मिती करणाऱया मानतो ही चांगली बाब आहे, परंतु यामुळे त्यांना प्रार्थनागृहातच कैद करणे योग्य नाही. महिलांना आम्ही घर आणि समाजात समान अधिकार द्यावे लागतील आणि निर्णय स्वातंत्र्य द्यावे लागणार असल्याचे सरसंघचालकांनी नमूद पेले आहे.
धर्म आधारित लोकसंख्या असंतुलन
देशात एक व्यापक लोकसंख्या नियंत्रण धोरणाची गरज असून ते सर्वांवर समान स्वरुपात लागू व्हावे. राष्ट्रहित विचारात घेत लोकसंख्या असंतुलनावर आम्हाला नजर ठेवावी लागणार आहे. सर्वांवर समानपणे एक धोरण लागू झाल्यास कुणालाही सवलती मिळणार नाहीत. लोकसंख्येतील असमानता भौगोलिक सीमांमध्ये बदल घडवून आणते. लोकसंख्या नियंत्रण आणि धर्म आधारित लोकसंख्या संतुलन या मुद्दय़ांकडे दीर्घकाळापर्यंत डोळेझाक करता येणार नाही. धर्म आधारित लोकसंख्या असंतुलन आणि धर्मांतर देशाला तोडतात. पूर्व तिमोर, कोसोवो आणि दक्षिण सूदान यासारखे नवे देश धार्मिक आधारावर झालेल्या लोकसंख्या असंतुलनाची उदाहरणे असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.
मातृभाषा अन् नवे शिक्षण धोरण मातृभाषेसोबत अन्याय होत असल्याची ओरड आम्ही नेहमीच करत असतो, परंतु आता नव्या शिक्षण धोरणात अशा मातृभाषांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंतु मातृभाषेत शिक्षण प्रदान करणाऱया संस्थांमध्ये आम्ही आमच्या मुलांना पाठवत आहोत का हा खरा प्रश्न आहे. उज्ज्वल भविष्यासाठी इंग्रजी शिक्षण आवश्यक असल्याचा भ्रम तयार झाला आहे. आमच्या देशातील दिग्गज व्यक्तींनी मातृभाषेतूनच शिक्षण घेतल्याचे दिसून येते. आयुष्याचा उद्देश शिकणे आणि चांगले पैसे कमाविणे आहे हे जोपर्यंत पालक स्वतःच्या मुलांना सांगत राहतील, तोपर्यंत आमच्या देशात संस्कारी अन् जबाबदार नागरिक मिळणार नाहीत. ही केवळ पैसा निर्माण करणारी यंत्रे ठरतील असे भागवत यांनी म्हटले आहे.