प्रवाशांमधून मागणी : किनारपट्टीला जोडण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
मिरज-मंगळूर मार्गावर महालक्ष्मी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. बेळगाव, हुबळी, अरसिकेरे मार्गे रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांनाही सोयीस्कर ठरणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकाचा भाग कोकण किनारपट्टीशी जोडला जाईल. यासंदर्भात काही प्रवाशांकडून नोंदणीचा उपक्रम राबविण्यात आला होता.
मंगळूर येथे बंदर असल्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. नामवंत मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज असल्यामुळे मिरज, बेळगाव, कोल्हापूर, हुबळी परिसरातील युवक शिक्षणासाठी मंगळूर येथे आहेत. सध्या बेळगावहून मंगळूरला जाण्यासाठी पूर्णा एक्स्प्रेस हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. ही एक्स्प्रेसही साप्ताहिक असून ती मडगावमार्गे धावते. त्यामुळे मिरज-मंगळूर व्हाया बेळगाव, हुबळी, अरसिकेरे मार्गे एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
थेट रेल्वेची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित
मिरज-बेळगाव परिसरातून कोकण किनारपट्टीवरील गोव्याला जाण्यासाठी दररोज गोवा एक्स्प्रेस उपलब्ध आहे. परंतु त्यापुढील कारवार, उडुपी, मंगळूर येथे जाण्यासाठी थेट रेल्वे नाही. पर्यटनासाठी मंगळूरपासून गोव्यापर्यंतच्या परिसरात शेकडो पर्यटकांची ये-जा असते. रेल्वेची सुविधा नसल्याने त्यांना खासगी वाहनाने अथवा बसने ये-जा करावी लागते. त्यामुळे थेट रेल्वेची मागणी मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे.
एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी मिरज, बेळगाव, हुबळी येथील प्रवाशांनी ऑनलाईन नोंदणी मोहीम उघडली होती. या मोहिमेला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नैत्य रेल्वे अथवा कोकण रेल्वेने या मार्गावर रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.