तंत्रज्ञानाच्या नकारात्मक वापराने राखही होऊ शकते
प्रतिनिधी /वास्को
विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मात्र, याला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू आहेत. नकारात्मक गोंष्टींवर नियंत्रण ठेवण्याची भुमिकाही विज्ञान आणि तंत्रज्ञाानच पार पाडत आहे. अन्यथा विज्ञान तंत्रज्ञानाच्या नकारात्मक वापराने एखादय़ा देशाची राखही होऊ शकते असे मत व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजांमध्ये जागृती निर्माण होण्याची गरज असल्याचे सांगितले.
सांकवाळ येथील बिटस् पिलानी गोवा कॅम्पस्मध्ये काल शुक्रवारी नॅशनल फोरेन्सीक सायन्सीस युनिव्हर्सीटी गोवाने माहिती सुरक्षा, गुप्तता आणि डिजिटल फोरेन्सीक या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परीसंवादाच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री सावंत उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या परिसंवादाचे उद्घाटन केले. यावेळी यावेळी व्यासपीठावर गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग, भारतीय नौदलाचे रियर ऍडमिरल राजीव धनकर, भारतीय लष्काराचे कमांडर आदीत्यसिह सहानी, फोरेन्सीक युनिव्हर्सीटी गांधीनगरचे डॉ. सी.व्ही. जडेजा, प्रा. एस.एस. अयंगार, बिटस् पिलानी गोवा कॅम्पस्चे संचालक डॉ. सुमन कुंडू, फोरेन्सीक युनिव्हसीर्टी गोवा कॅम्पस्चे संचालक डॉ. नवीनकुमार चौधरी व मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळय़ात बोलताना मुख्यमंत्र्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान कोणत्याही देशाचा विकास घडवण्यासाठी उपयुक्त असते तसेच हेच क्षेत्र एखादय़ा देशाला अपयशी ठरवू शकते. विसाव्या शतकात जगाला विज्ञानाकडून दोन देणग्या मिळाल्या. एक कॉम्प्युटर आणि दुसरे इंटरनेट. हे दोन महान शोध साऱया जगाला बदलणारे ठरले. आजची पिढी इंटरनॅट शिवाय जगाची कल्पनाच करू शकत नाहीत. परंतु नाण्याला दोन बाजु असतात. विज्ञान व तंत्रज्ञानाचेही तसेच आहे. या संशोधनातून निर्माण होणाऱया वाईट गोष्टींवर नियंत्रण ठेवायलाच हवे. अन्यथा त्याचे वाईट परीणाम होतात. कोविड काळात इंटरनेटचा फार मोठा आधार जनतेला मिळाला. याच काळात जनतेला इंटरनॅटची खरी गरज कळली. या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाले. वर्क फ्रॉम होम लोकांना समजले. ऑनलाईन शिक्षणाचाही प्रसार झाला. अशा पध्दतीने इंटरनेटचा सकारात्मक वापर होत आहे. परंतु दुसऱया बाजुने सायबर गुन्हेगारीही वाढलेली आहे. या गुन्हेगारीचा धोका देशालाही आहे. देशाच्या विकास आणि सुरक्षेला या गुन्हेगारीपासून धोका आहे. सायबर धोक्यापासून कोणीही सुरक्षीत नाही. या गुन्हेगारीला बळी पडण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांमधील अज्ञान आणि जागृतीचा अभाव. या गुन्हेगारीचा आव्हान स्विकारण्यासाठी जागृती, ज्ञान आणि प्रशिक्षण या गोष्टी आवश्यक आहेत. या क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी कुशल प्रशिक्षक आणि व्यवसायतज्ञांची आवश्यकता आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी यावेळी या गुन्हेगारी विषयी आणि गोव्यातील सद्यस्थितीविषयीही माहिती दिली.
गोव्यात नॅशनल फोरेन्सीक सायन्सीस युनिव्हर्सीटी आहे हे गोवा राज्यासाठी गौरवास्पद असून या संस्थेसाठी राज्य सरकारने स्वातंत्र कॅभ्पस्साठी जमीनही उपलब्ध केलेली आहे. या पुढेही राज्य सरकार या युनिव्हर्सीटीला मदत करीत राहील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या आंतरराष्ट्रीय परीसंवादात जगभरातील तज्ञ आपले सायबर सुरक्षा आणि संबंधीत विषयावर विचार मांडतील, अनुभव आणि ज्ञानाचे आदानप्रदान करतील. याचा निश्चितच या क्षेत्रातील धोके दूर करण्यास लाभ होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या परीसंवादात सहभागी झालेल्या तज्ञांचे निसर्गसौदर्य लाभलेल्या गोव्यात आपण स्वागत करीत असल्याचे नमूद केले.
या उद्घाटन सोहळय़ात उपस्थित मान्यवर तज्ञांनीही आपले विचार मांडले. या आंतरराष्ट्रीय परीसंवादाची आज शनिवारी संध्याकाळी सांगता होणार आहे.