शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे : गद्दरांना मतदारच धडा शिकवतील
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवसेना हा जनतेच्या प्रवाहासोबत जाणारा पक्ष आहे. सध्याच्या परिस्थितीत जनताही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. राजयातील जनता केवळ निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहे. या निवडणुकांमध्ये गद्दारांना मतदारच धडा शिकवतील, असा विश्वास शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे कोल्हापुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ. गोऱहे म्हणाल्या, प्रसारमाध्यमांवर सध्या राजकीय वादावर जास्त चर्चा सुरु आहे. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट असा उल्लेख होत आहे. मात्र शिवसेना हि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच आहे. पक्षप्रमुखांना सोडून गेला तो गट आहे. या गटातीलच काही जणांकडून शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत. आत्ताच यांना हे शिवसैनिक वाईट का वाटू लागले. मागील काळात ते त्यांच्या सोबतचे होते. या धमक्यांची सरकारने दखल घेवून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
हे ही वाचा : तिर्थक्षेत्र विकास मंत्रालय स्थापन करण्याची गरज- नीलम गोऱ्हे
खासदारांचा निधी गेला कुठे?
कोरोना काळात मविआ सरकारने आमदारांना कोरोना उपाययोजनांसाठी ज्यादाचा दोन कोटी निधी दिला. मात्र या उलट केंद्र सरकारने खासदारांचा निधी गोठवला. हा निधी गेला कुठे याची पारदर्शकता नाही. महाराष्ट्रातील खासदारांचा गोठवलेला निधी नंतरच्या काळात महाराष्ट्रात आला का, याची स्पष्टोक्ती केंद्र सरकारने द्यावी, असे आव्हान डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
पालक गमावलेल्या बालकांना बाराशे रुपये
कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना महिना अडीच हजार मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने हि मदत बाराशे रुपयांवर आणली. या निर्णयाला विरोध केला तरीही विद्यमाने सरकारने त्यांचा निर्णय कायम ठेवल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्धीसाठी ठाकरेंवर टिका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केल्याशिवाय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही. त्यांच्यवर टिका केली की लगेच प्रसिद्धी मिळते त्यामुळे शिंदे गटातील आमदारांकडून केवळ प्रसिद्धीसाठी ठाकरे परिवारावर टिका केली जात असल्याचा आरोप डॉ. गोऱ्हे यांनी केला.
टक्केवारी उघड करा
शिवसेनेत टक्केवारी चालते असे रामदास कदम म्हणतात, याबाबत विचारले असता डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेत टक्केवारी चालत असेल आणि याची माहिती त्यांच्याकडे असेल तर ती त्यांनी उघड करावी, असे आव्हान केले.